वायव्य सरहद्द प्रांतातील चैतन्याचा झरा!

29

(सरहद्द गांधी पुण्यस्मरण दिन)

खान अब्दुल गफारखान हे सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध होते. ते वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय व्यक्ती होत. त्यांनी सन १९२९मध्ये खुदाई खिदमतगार ही संघटना उभारली होती. या संघटनेच्या सदस्यांना लाल डगलेवाले म्हणून ओळखतात. ही संघटना सुर्ख पोश या नावाने देखील ओळखली जात होती. पुढे वाचा श्री निकोडे कृष्णकुमार गुरूजींचा हा लेख… 

अब्दुल गफ्फार खान हे एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते. त्यांना महात्मा गांधीसारखे अहिंसा आंदोलनासाठी ओळखले जात होते. ते गांधीजींचे समर्थक होते. ब्रिटिश इंडियामध्ये त्यांना फ्रंटियर गांधी या नावाने संबोधले जायचे. खुदाई खिदमतगारच्या यशामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या व समर्थकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काही जण या दडपशाहीस बळी पडले. बच्चा खानने अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या भारत फाळणीच्या मागणीचा जोरदार विरोध केला. जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विभागीय योजनेची स्वीकृती जाहीर केली तेव्हा विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तान सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

खान अब्दुल गफारखान यांचा जन्म दि.६ फेब्रुवारी १८९०मध्ये ब्रिटिश इंडिया पेशावर, पाकिस्तान येथील उत्मानजई येथे झाला. त्यांचे वडील बहराम हे तेथील जमीनदार होते. स्थानीय पठाण लोकांचा विरोध असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना व त्यांच्या भावाला मिशन स्कूलमध्ये शिकवले. त्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम महाविद्यालयात पूर्ण केले. सन १९१०मध्ये त्यांनी आपल्या गावामध्ये एक शाळा उघडली. त्यानंतर ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. सन १९१५साली ब्रिटिशांनी त्यांच्या शाळेवर बंदी घातली. सरहद्द गांधी यांना स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष असा भारत देश पाहिजे होता. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी सन १९२९ मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संघटना उभारली होती. ही संघटना सुर्ख पोश तसेच लाल डगेलेवाले या नावाने देखील ओळखली जात होती. या संघटनेची स्थापना म.गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह यांसारख्या सिद्धांताने प्रेरित होऊन केली होती. या संघटनेमध्ये साधारणतः एक लक्ष सदस्य सामील झाले. त्यांनी शांततापूर्वक इंग्रज पुलिसांचा विरोध केला. खान अब्दुल गफारखान हे म.गांधींचे एकनिष्ठ अनुयायी व पख्तुनांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते होते. त्यांचा जन्म पेशावरजवळील उत्मानझाई या खेड्यात एका श्रीमंत घराण्यात झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पेशावर येथे झाले. त्यांनी लष्करात गाइड्स या तुकडीत नोकरी धरली. गोऱ्या अधिकाऱ्यांकडून हिंदी लष्करी अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत होती.म्हणून लष्करी नोकरीचा त्याग करून ते अलीगढ विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. सन १९१०पासून आपल्या प्रदेशात राष्ट्रीय शाळा काढून पठाण बांधवांत जागृती व देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.

रौलट ॲक्टसारख्या जुलमी कायद्याविरूद्ध महात्मा गांधीनी सुरू केलेल्या आंदोलनात गफारखानांनी सक्रिय भाग घेऊन वायव्य सरहद्द प्रांतात चैतन्य निर्माण केले. सन १९२०च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घेतला तसेच आपल्या प्रांतात खिलाफत चळवळ संघटित केली. सन १९२४मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य हाती घेतले. सन १९२९मध्ये म.गांधी, नेहरू, मौलाना आझाद आदी भारतीय पुढाऱ्यांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेस चळवळीत ते सामील झाले. याच कार्यास मदत व्हावी, म्हणून खुदाई खिदमतगार ही स्वयंसेवक संघटना त्यांनी स्थापन केली. पठाण जमातीत सत्य, अहिंसा, शिस्त व राष्ट्रप्रेम निर्माण करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश होता. ब्रिटीश सरकारचा रोष होऊन ही संघटना बेकायदेशीर ठरविण्यात आली. नंतरच्या सत्याग्रहात त्यांना पुन्हा कारावास भोगावा लागला.

काँग्रेसचे अध्यक्ष पद गफारखानांना दोनदा देऊ केले असता आपण केवळ एक सेवक आहोत, असे म्हणून त्यांनी ते नाकारले. एवढेच नव्हे तर प्रांतीय अगर अखिल भारतीय निवडणुकीस उभे राहण्याचेही त्यांनी कधीच मान्य केले नाही. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे ते सन १९४७च्या फाळणीपर्यंत सदस्य होते. सन १९२०-४७पर्यंत त्यांनी एकंदर चौदा वर्षांचा तुरुंगवास भोगला. विभाजनानंतर बच्चा खान यांनी पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली, पण सन १९४८-५४च्या दरम्यान पाकिस्तानी सरकारने त्यांना वारंवार अटक केली. सन १९६९मध्ये पुन्हा युनिट कार्यक्रमाच्या विरोधात त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या वाटाघाटीत भारताचे विभाजन होण्याची चिन्हे दिसताच त्याला गफारखानांनी तीव्र विरोध तर केलाच, परंतु विभाजन झालेच तर वायव्य सरहद्दीवरील पठाणांचा स्वायत्त पख्तुनिस्तान झाला पाहिजे, असाही त्यांनी आग्रह धरला. परंतु त्यांचा प्रयत्न निष्पळ ठरला आणि सरहद्द प्रांत पाकिस्तानचाच एक भाग झाला. भारतीय पुढाऱ्यांनी आम्हाला लांडग्यांच्या ताब्यात देऊन स्वतःला स्वातंत्र्य मिळविले, असे दुःखपूर्ण उद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते. म.गांधींच्या आदेशानुसार ते आपल्या प्रांतात गेले. पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याची त्यांनी शपथही घेतली. पण आपल्या प्रदेशासाठी स्वायत्तता मिळाली पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला. त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात येऊन त्यांची खुदाई खिदमतगार संघटना बंद करण्यात आली. पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून सन१९६४पर्यंत जवळजवळ ते पाकिस्तानी तुरुंगातच राहिले.

प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सप्टेंबर १९६४मध्ये गफारखानांना इंग्लंड येथे जाण्याची पाकिस्तान सरकारने परवानगी दिली. पाकिस्तानात परत येणे धोक्याचे आहे, हे जाणून ते डिसेंबरमध्ये अफगाणिस्तानात गेले. गांधी जन्मशताब्दी महोत्सवात भाग घेण्यासाठी गफारखान भारत सरकारच्या निमंत्रणानुसार ऑक्टोबर १९६९मध्ये भारतात आले. येथील मुक्कामात त्यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी योजण्यात आलेले नेहरू पारितोषिक देण्यात आले. भारतासाठी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी त्यांना थैली अर्पण केली. सरहद्द प्रांतातील म.गांधींसारखी महान व्यक्ती म्हणून त्यांना सरहद्द गांधी असे गौरवाने संबोधिले जाते. त्यांचा मृत्यू दि.२० जानेवारी १९८८ रोजी पेशावर येथे झाला.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे सरहद्द गांधींच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️श्री निकोडे कृष्णकुमार गुरूजी.द्वारा- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक.मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६