कुस्तीपटू खेळाडूंचा आक्रोश सरकारला का दिसत नाही?

35

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभुषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे लैंगिक शोषणप्रकरणी अटकेची कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा या मागणीसाठी दिनांक 23 एप्रिल 2023 रोज रविवार पासून आघाडीचे कुस्तीगिरांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे. परंतु सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. कारण ब्रृजभुषण शरण सिंह सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने सरकार याप्रकणाकडे पाठ फिरवितांना स्पष्ट दिसून येते. ब्रृजभुषणवर लावलेले आरोप खरे की खोटे याची गांभीर्याने चौकशी व्हायलाच हवी. कारण कोणी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्यात अर्धसत्य अवश्य असतें व कारवाई नंतर सत्य सामोरं येते.त्यामुळे ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर असलेले आरोप अत्यंत गंभीर, घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे त्यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही. याकरिता त्यांना संपूर्ण पदावरून ताबडतोब बरखास्त करून फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून कारवाई व्हायलाच हवी व पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा.कारण सरकारने व न्यायपालिकेने आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करावी असे मला वाटते. ब्रृजभुषण शरण सिंह यांच्यावर 85 गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते.परंतु सरकारने यावर मौन धारण केल्याचे दिसून येते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

म्हणजे सरकार ब्रृजभुषणवर कारवाई न करता त्यांना खुले समर्थन करीत असल्याचे स्पष्ट दिसून येते ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. सरकारने आतापर्यंत ब्रृजभुषण शरण सिंह यांना सर्वच पदावरून हटवून कडक कारवाई करायला हवी होती.कारण ब्रृजभुषण वरील आरोप लज्जास्पद, घृणास्पद, गंभीर आणि संपूर्ण खेळांना कलंकित करणारे आहेत. कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन बघता ब्रृजभुषण शरण सिंह यांच्या विरोधात भूमिका घेण्याऐवजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा खासदार पी. टी.उषा यांनी सरकारची बाजू घेत कुस्तीगीर महीलांनाच दोष दिला आहे.कुस्तीपटुमध्ये शिस्त नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होत आहे असे पी.टी.उषा म्हणतात. पी. टी. उषांचे हे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे. कारण खेळांमध्ये देशाची प्रतिमा ब्रृजभुषणमुळे मलीन होत आहे. कारण भारतात लोकशाही आहे.

लोकशाहीमध्ये योग्य वेळेवर न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरून शांततेने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागतो ही बाब पी.टी.उषां यांनी लक्षात ठेवली पाहिजे. सोबतच त्या म्हणतात की रस्त्यावर उतरणे बेशिस्तीची वागणूक आहे.परंतु त्यांनी हेही लक्षात ठेवायला पाहिजे की कुस्तीपटुंना न्याय न मिळाल्याने रस्त्यावर उतरावे लागले. ब्रृजभुषण शरण सिंह यांच्यावरील गंभीर आरोपांच्या समर्थनार्थ पीडीतांना साथ द्यायला हवी होती. परंतु पी.टी.उषा सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्यानेच आंदोलकांपासुन पाठ फिरवून आंदोलकांना ग्यान सांगतांना दिसतात ही बाब योग्य नाही. माझ्यामते ब्रृजभुषण शरण सिंह यांच्या विरोधात कायद्याच्या माध्यमातून कोणताही निकाल लागो. परंतु त्यांच्यावरील अत्यंत गंभीर आरोप पहाता त्यांना कोणत्याही संविधानीक पदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही असे मला वाटते. देशाच्या 135 कोटी जनतेने लक्षात ठेवले पाहिजे की ब्रृजभूषण शरण सिंह वरील आरोप राजकीय नसुन अती संवेदनशील आणि गंभीर आरोप असुन कुस्तीगीर पटुंच्या लैंगिक शोषणप्रकरणाचे आहेत.

त्यामुळे भारतातील संपूर्ण खेळाडूंनी मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांनी कुस्तीगीरांच्या आंदोलनाला सोशल मिडियाच्या माध्यमातून, ट्युटरच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा आंदोलन स्थळावर जाणवु अशा प्रकारे सर्वच स्तरातून खुले समर्थन करायला हवे.कारण ब्रृजभूषण शरण सिंह वरील आरोप अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.त्यामुळे देशातील संपूर्ण आजी-माजी खेळाडूंचे समर्थन मिळणे अती आवश्यक आहे.कारण गेल्या तीन महिन्यांपासून कुस्तीगीर पटु सरकारला न्याय मागत आहे.यावर ऑलिम्पिक पटुंनी व सर्वच स्तरातील खेळाडूंनी आंदोलक कुस्तीपटूंना सहकार्य करण्याची गरज आहे. बृजभूषणच्या विरोधात सात महिला कुस्तीपटुंनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तक्रार नोंदविण्यात आली होती. त्या अनुषंगाने ब्रृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.या गुन्ह्यात पॉक्सोसह विविध कलमे सिंह यांच्यावर लावण्यात आली आहेत.परंतु आंदोलक कुस्तीगीर पटु म्हणतात की जोपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे ठामपणे कुस्तीगीरांनी सांगितले. त्याचप्रमाणे संपूर्ण पदावरून बरखास्ती सुध्दा आवश्यक आहे.कारण सर्वसामान्य गुन्हेगारांवर ताबडतोब कारवाई होते तर बृजभूषणवर का नाही असा प्रश्न कुस्ती पटुं व सर्वसामान्यांच्या मनात भेडसावत आहे. यांच्या विरोधात सात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.

ब्रृजभुषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या संपूर्ण पीडित महीलां खेळाडूंना सरकारने ताबडतोब सुरक्षा प्रदान करावी असे मला वाटते. त्याचप्रमाणे सरकारने कोणतीही विलंब न करता ताबडतोब बृजभूषण शरण सिंह यांना संपूर्ण महत्वपूर्ण पदावरून हटवून कठोर कारवाई करावी.तेव्हाच कुस्तीगीरांना योग्य न्याय मिळेल.सरकारने लक्षात ठेवले पाहिजे की देशाचा प्रत्येक खेळाडू देशाची शान आहे.त्यामुळे ब्रृजभूषण सारखे अनेक अध्यक्ष येतील आणि जातील. परंतु खेळाडू तयार करायला अनेक वर्षे लागतात. कारण प्रत्येक खेळाडू हा मातीतून तयार होतो.खेळाडूंचा विजय हीच देशाची आन-बान-शान. जय हिंद!

✒️लेखक-रमेश कृष्णराव लांजेवार(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)मो.नं. 9921690779, नागपूर.