पत्रकारांच्या विविध मागण्यांना घेऊन व्हॉइस ऑफ मीडिया नागपूर जिल्हातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

29

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.12मे):- पत्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी 11 मे रोजी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत गुरुवारी सकाळी 11 ते 1 या वेळेत नागपूर येथील संविधान चौक परिसरात धरणे आंदोलन करून निवासी उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून पुरेसा निधी देण्यात यावा. पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना मान्यता प्रमाणपत्र देण्यात यावे. वर्तमानपत्रातील जाहिरातींवर सध्या लागू असलेला जीएसटी रद्द करण्यात यावा. पत्रकारांना निवासाकरिता शासकीय भूखंड देण्यात यावेत. कोरोनामध्ये प्राण गमावलेल्या पत्रकारांसाठी, मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.

सरकारचे सध्याचे जाहिरात धोरण, क श्रेणीतील दैनिकांना (छोटी दैनिके) मारत आहे. मध्यम (ब श्रेणी) दैनिकांना दिल्या जाणाऱ्या जाहिराती छोट्या दैनिकांनाही दिले गेले पाहिजेत. साप्ताहिकालाही तेवढीच जाहिरात द्यावी, या विविध मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.धरणे आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाह आनंद आंबेकर, राजीव रंजन कुशवाह, श्रीकांत कुरुंभते, ज्योती द्विवेदी, राहुलप्रसाद शर्मा, राजेश सोनटक्के, जितेंद्र धाबर्डे, फहीम खान, अमित बोरकर, सौरभ वाघमारे, भोजराज नागपुरे, दिलेश हजारे, संकेत डोंगरे, शुभम बोरधरे, याकूब खान, नितीन फुल्लुके, प्रकाश शुंकलवार आदींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.