महा अंनिसचा चमत्कार दाव्यांना होतोय विरोध!

72

(मदर तेरेसा पुण्यस्मरण विशेष)

मदर तेरेसा धाडसी होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स.१९८२मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर व इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्यावेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्यावेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीचा प्रसार केला. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या आजीवन झटत होत्या, त्या खरोखरच शांतिदूत होत्या. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला. त्या तिथे गेल्या. ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली, तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्या तिथे गेल्या. ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला. मदर तेरेसा यांनी संतपदाची कसोटी असलेली दुस‍ऱ्या चमत्काराची अट पूर्ण केली. त्यांना संतपद देण्याचा सोहळा डिसेंबर २०१५मध्ये झाला. ही उपाधी दि.९ सप्टेंबर २०१६ला लालवेटिकन सिटीमध्ये पोप फ्रांसिसने मदर तेरेसा यांना बहाल केली.

मदर तेरेसा यांचे जन्मनाव ऑग्नीसा गाँकशा वाजक्शियू असे होते. त्यांचा जन्म दि.२६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानिया येथे झाला. या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार होते. त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला; अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण त्या सगळ्या तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, आपण त्यांचे धर्मांतर घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना, मुस्लिमांना अधिक चांगले मुस्लिम व्हा, तर ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते. इ.स.१९७९मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा आणि इ.स.१९८०मध्ये त्यांना भारतरत्न किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की त्यांना दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.

मदर तेरेसा यांचे देहावसान दि.५ सप्टेंबर १९९७ साली झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संतपद देण्यासाठी २००३ साली पहिला चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आला. मोनिका बसेरा नावाच्या पश्चिम बंगाल येथील तरुणीच्या पोटातील कर्करोगाची गाठ मदर तेरेसांच्या फोटोमधून दिव्य शक्ती मिळाल्यामुळे बरी झाल्याचा हा दावा होता. आता विज्ञानाच्या कसोटीवर विचार करायचे ठरवले, तर एखादी व्यक्ती मृत्यूनंतर देखील इतर लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते, हीच गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. थोडे पुढे जाऊन या दाव्यातील वास्तव समजून घेतले, तर अनेक गोष्टी लक्षात येतात. प्रत्यक्षात कुठलेही साक्षी पुरावे न देता हा दावा करण्यात आला होता.

चौकशीमध्ये पुढे हे देखील समोर आले होते, की प्रत्यक्षात त्यांना क्षयरोगाचा उपचार चालू होता. त्यांच्या पोटातील गाठ देखील क्षयरोगातून झालेली होती आणि क्षयरोगाच्या उपचारांनी ती गाठ बरी झाली होती. त्यावेळी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महा.अंनिसने या चमत्काराच्या दाव्याला विरोध केला होता. वास्तव समाजापुढे ठेवले होते. त्यानंतरही त्याच पद्धतीने २००८मध्ये केवळ मदर तेरेसा यांचे नाव घेऊन प्रार्थना केल्यामुळे ब्राझीलमधील एका व्यक्तीच्या मेंदूतील गाठी ब‍ऱ्या झाल्याचा चमत्कार घडल्याचा दावा केला जात आहे. ही व्यक्ती कोण आहे? त्याला नक्की कोणता आजार होता? प्रार्थनेमुळेच हा आजार बरा झाला, हे कशावरून सिद्ध होते?

यांपैकी कोणत्याही प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न देता केवळ चमत्कार झाला, असे सांगणे हे विज्ञानाच्या प्राथमिक कसोट्यांवर देखील उतरत नाही. आता मात्र या चिकित्सेवर पडदा पडला की काय? याबद्दल काहीही कळत नाही. त्यांना दि.१७ डिसेंबर २०१५ पोप फ्रान्सिस यांनी संत घोषित केले. पंधरा भारतीय अधिकरी व हजार एक अन्य लोक दि.५ सप्टेंबर २०१६ रोजी सेंट पीटर स्वेअरमध्ये संतपणाच्या मिसबलिदानात सामील झाले होते. सन २०१२मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर तेरेसा पाचव्या क्रमांकावर होत्या.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे शांतिदूत मदर तेरेसा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी. गडचिरोली,मो. ७७७५०४१०८६