त्वष्टा तांबट समाज विकास मंडळातर्फे गुणवंतांचा गुणगौरव…

233

🔸समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप मोलाची असते — लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.18सप्टेंबर):– त्वष्टा तांबट समाज विकास मंडळ जळगाव यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान विश्वकर्मा आणि आदिशक्ती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर अतिथी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश व समाज राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या मनोगतातून समाज संघटन, विद्यार्थी व पालक संवाद, मोबाईल चा अतिरेक धोकादायक, स्पर्धात्मक युग, आई वडील आणि मुलं इ. विविध विषयांवर विविध उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप मोलाची असते, असे मत लक्ष्मणराव पाटील यांनी व्यक्त केले. बन्सल क्लासेसचे संचालक चंद्रशेखर कासार सरांनी देखील विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी कसे व्हावे याचा मूलमंत्र दिला. स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर विद्यार्थांनी चौकस राहिलं पाहिजे असं मत कासार सरांनी मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्वष्टा तांबट समाजाचे अध्यक्ष कैलासशेठ तांबट आणि उपाध्यक्ष सदाशिवशेठ तांबट उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केजी सेक्शन पासून ते उच्च शिक्षण घेऊन यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्वष्टा तांबट समाज विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच महिला मंडळाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक व समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि बहारदार शैलीत सूत्रसंचालन निलेश तांबट यांनी तर आभार प्रदर्शन वंशिका सोनकर या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान ने झाली.