क्रांतीभूमीत शिक्षणक्रांती व्हावी-ॲड.दीपक चटप : चिमूरात शिक्षणयात्रेतून उच्चशिक्षणावर संवाद

75

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24डिसेंबर):-देशात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवणारी चिमूर ही क्रांतीभूमी आहे. या भूमीतून देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेवून देशविकासात योगदान द्यावे. क्रांतीभूमीत आता शिक्षण क्रांती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड. दीपक चटप यांनी केले. शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी दरम्यान उच्चशिक्षणाची शिक्षणयात्रा ॲड.दीपक चटप यांनी सुरू केली.

चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात कार्यक्रम पार पडले. यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.अमीर धमानी, प्राचार्य डॉ.अश्वीन चंदेल, शिक्षणयात्रेचे समन्वयक अविनाश पोईनकर, प्रा.कार्तीक पाटील, केंद्रप्रमुख महल्ले, नेचर फाऊंडेशनचे निलेश नन्नावरे, स्नेहा नन्नावरे, ब्राईट एज फाउंडेशनचे श्रीकांत एकुडे, सुरेश डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रांतीभुमीतील विद्यार्थ्यांत प्रचंड क्षमता आहे. नामांकित विद्यापीठांची प्रवेशप्रक्रिया, शिष्यवृत्ती, फेलोशीपबाबतच्या संधीचे मार्गदर्शनही यावेळी त्यांनी केले. प्राचार्य डॉ.धमानी यांनी उच्चशिक्षातूनच आदर्श समाजनिर्मीती होईल असा आशावाद व्यक्त केला. प्राचार्य डॉ.चंदेल यांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असल्याचा गुणधर्माची विद्यार्थ्यांना शिक्षण देत शिक्षणानेच माणसात सिद्धता येते असे मार्गदर्शन केले. अविनाश पोईनकर यांनी शिक्षणयात्रेची भुमीका मांडली. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

•••

देश-विदेशातील या नामांकित विद्यापीठांची दिली माहीती

लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, सोएस, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, क्विन मेरी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, ऑक्सफर्ड, केंब्रिज आदी विदेशातीतील नामांकित विद्यापीठे तसेच अझीम प्रेमजी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, राष्ट्रीय विधी महाविद्यालय, निर्मला निकेतन काॅलेज ऑफ सोशल वर्क, इंडीयन स्कुल ऑफ पब्लिक पाॅलीसी, इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, आयआयटी, आयआयएम, शिवनादर आदी देशभरातील नामांकित विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, नामांकित फेलोशीप याबद्दल माहिती देण्यात आली. पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेशासाठी सहकार्य करणार असल्याचे ॲड.दीपक चटप यांनी सांगितले.