नाट्यश्रीच्या आठवडी कवितास्पर्धेत प्रा.कृष्णा कुंभारे उत्कृष्ट कवी

219

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.७ जानेवारी):-स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नवोपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करून त्या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता” व कवीला “आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येत आहे. त्यातील पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे.

या नवोपक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून यात ३१ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात वरुड, जिल्हा- अमरावती येथील प्रा.कृष्णा कुंभारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “ती” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.

कवी प्रा.कृष्णा कुंभारे हे ज्येष्ठ कवी असून शंकरराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, खापरखेडा येथून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा “अक्षरशिल्प” हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला असून ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहेत. अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पहिल्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संजय कुनघाडकर, उपेंद्र रोहनकर, पी.डी.काटकर, स्वप्नील बांबोळे, प्रभाकर दुर्गे, पुरुषोत्तम लेनगुरे, हरिष नैताम, सुनील मंगर, सुनीता तागवान, गजानन गेडाम, रामराज करकाडे, चरणदास वैरागडे, तुळशीराम उंदीरवाडे, मनिषा हिडको, राजरत्न पेटकर, अंगुलीमाल मायाबाई उराडे, भिमानंद मेश्राम, रुपाली म्हस्के, कृष्णा कुंभारे, प्रब्रम्हानंद मडावी, मिलिंद खोब्रागडे, सिध्दार्थ गोवर्धन, वसंत चापले, ज्योत्स्ना बन्सोड, प्रतीक्षा कोडापे, सुजाता अवजट, प्रिती चहांदे, संदिप आंबोरकर, रविंद्र गेडाम व खुशाल म्हशाखेत्री इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता. या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे कळते. ही माहिती आमच्या न्युज मीडियाला श्री कृष्णकुमार जी.निकोडे गुरूजींनी अवगत करून दिली आहे.