स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना : प्राचार्य सदाशिव मेश्राम

116

🔸बरडघाट येथे वार्षिक स्नेहसंमेलन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1फेब्रुवारी):-शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते.त्यामुळे गावातील शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यांच्यातील कलेला बहर येतो. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना चालना मिळून त्यांचा सर्वांगिण विकास साधल्या जाऊ शकतो असे प्रतिपादन ग्रामदर्शन विद्यालय खडसंगीचे प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी केले.

बरडघाट येथील जि. प. प्रा.शाळेत आयोजित वार्षिक शालेय स्नेहसंमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. स्नेहसंमेलनाचे उदघाटक म्हणून चिमूर येथील तुकडोजी मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर पिसे, उपक्रमशील शिक्षक प्रकाश कोडापे, रावन शेरकुरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर, सुरेश सहारे,पोलीस पाटील रामचंद्र सहारे,पंढरी श्रीरामे,रामभाऊ मेश्राम, हरिभाऊ रिनके, प्रभाकर दोडके, जया दोडके, मुख्याध्यापक सुरेश डांगे आदी उपस्थित होते.

पाहुण्यांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उदघाटक रामदास कामडी यांनी बरडघाट सारख्या लहान गावात शाळा, पालक आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तीन दिवसांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन अभिनंदनीय असल्याचे सांगत गावाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे राष्ट्रसंतांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी प्रभाकर पिसे, प्रकाश कोडापे,रावन शेरकुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले. संचालन अर्चना डफ यांनी केले.

वार्षिक स्नेसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळण्याकरिता विविध सांस्कृतिक, बौद्धिक, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार याप्रसंगी सादर केले. विद्यार्थ्यांसह पालकांनी सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला. आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गुरुदेव सेवा मंडळ, महिला मंडळ तथा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.