राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी ! रुपेश वाळके यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र ! भारतरत्न पुरस्कारासाठी उभारणार अनोखे आंदोलन !

52

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार साहित्य बहुआयामी व प्रेरणादायी आहे समाजाला मानवतेचा संदेश देणाऱ्या तुकडोजी महाराजांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न द्यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.
तुकडोजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अशा महान संताला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतीय अस्मिता सांभाळत सर्वधर्मसमभावाचा संदेश जनमानसात रुजविला. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांचा प्रखर विरोध करीत तीर्थक्षेत्राकडे न जाता जमीन कसून शेतीची कास धरावी, असे विचार ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मांडत सर्वसामान्यांना जगण्याचे बळ दिले. नव्या पिढीला जे माहीत नाही, ते देण्याचे काम अशा मानवतेचा व्यापक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून पोहोचविन्याचे कार्य केले आहे. तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीते’ला ग्रामीण भागातील ज्ञानकोश म्हणून संबोधिले जाते. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर तुकडोजी महाराजांनी केला, त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते, तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले, जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला म्हणूनच अशा थोर पुरुषाला मरणोत्तर तरी भारतरत्न द्यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी सांगितले.