रामभक्तीचा सर्वोत्तम नमुना! [हनुमान जयंती उत्सव विशेष.]

121

 

_दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात. यंदा भगवान हनुमानाची जयंती आज मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जात आहे. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर माहितीपूर्ण संकलित लेखात जरूर वाचा… संपादक._

हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून ते श्री रामांचे महान भक्त, दास, दूत मानले जातात. त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी. वीर मारुती हे अतिशय ताकदवान-महाबली होते. त्यांना अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्यांना भूक लागली असल्याने ते सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले परंतु त्यांना तो खेळ च वाटू लागला ते सारखा सूर्याला पकडायचे व सोडून द्यायचे त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरु लागला असे करत करत त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हे हनुमानांच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानजींचे तोंड वाकडे झाले व ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी ‘तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल’ असा शाप दिला.
पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि श्रीरामांचा निरोप माता सीतेला पोचवला. याच वेळ जम्बुवन्ताने आठवण करून दिल्याने त्यांना त्यांच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे. लंकाधिपती-रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून त्यांना आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावून लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता. हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे. भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. हनुमान जन्म स्थानाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसार, गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच असल्याचे सिद्ध झालेले आहे. प्रसिद्ध मराठी संत-कवी एकनाथ यांच्या भावार्थ रामायणात असे म्हटले आहे. !! बजरंगबली की जय !!
|| हनुमान जयंतीच्या सर्व बजरंगबली भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ||

– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.