मादक पदार्थ : समाजाला लागलेली किड

51

 

                  ■ विशेष लेख-
■ लेखिका- सौ. भारती दिनेश तिडके, रामनगर, गोंदिया

◆संकलन- वशिष्ठ खोब्रागडे, गोंदिया

आज मद्य व अमली पदार्थांचे सेवन करणे केवळ उच्चभ्रू लोकांपुरतेच सिमित राहिले नसून कामगार वर्ग; युवक ; विद्यार्थी तसेच युवती यांच्या पर्यत पसरले आहे. समाजातील उच्चवर्गीय लोक केवळ शौक व फॅशन म्हणून मादक पदार्थ चे सेवन करतात. तर गरीब वर्ग आपला थकवा घालवण्यासाठी; चिंतामुक्त होण्यासाठी मद्य व मादक पदार्थांच्या आहारी जातात.

मद्य पानाला सामाजिक प्रतिष्ठा सुध्दा प्राप्त झाली आहे. या सर्व कारणांमुळे मादक पदार्थ चे सेवन ही एक समाजाला लागलेली किड आहे. व्यसन कोणतेही असो “अती तिथे माती” या उक्तीप्रमाणे माणसाला मातीत मिसळण्यात सुद्धा कमी करत नाही. सुरूवातीला आनंद ; मनोरंजन म्हणून सुरू केलेले व्यसन हे हळूहळू शरीराची आवश्यकता बनत जाते. मद्य पानांचे व्यसन हे आज प्रतिष्ठित पणाचे लक्षण समजले जाते. प्रसंग सुखदुःखाचा कुठलाही असो; मद्य पीने हा शिष्टाचार समजला जातो. कलावंतांमध्ये सुद्धा मद्य पानाची अभिरुची दिसते परंतु यांचे दुष्परिणाम म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे आहे याचा साधा विचारही ही मंडळी करीत नाही. व्यसन हे मदयाचे असो, तंबाखू, बीडी, सिगारेट, गांजा, अफीम इत्यादी कोणतेही असो यामुळे जीवनाची नासाडी ही ठरलेली आहे. व्यसनाधीन व्यक्तीचे कुटुंब उध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. मद्य पिऊन आलेल्या व्यक्ती सोबत घरच्या मंडळींना नानाविध त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने असंसर्गजन्य आजारांची ओझे आणि परीणाम हा अहवाल मास्को मध्ये प्रसिद्ध केला. दारू च्या अतिसेवनामुळे कर्करोग; हदयविषयक आजार, लिव्हर सिरसिस इ. रोग व पैशाची सुध्दा नासाडी होते.१९९० मध्ये दारूचा पहिला घोट घेण्याचे वय २८ होते. ते आता १५ वर आलेले आहे. पुरुषांसोबत महिलांना सुद्धा मद्यपान करण्याची सवय जडलेली आहे. भारतात साधारणपणे ६:२५ कोटी नागरिक दारू सेवन करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, सु संस्काराचा अभाव, वाईट मित्र संगती, पैसा अशा प्रमुख कारणामुळे व्यक्ती मादक पदार्थ कडे वळू लागला आहे. मादक पदार्थ एखाद्या ऑक्टोपस प्रमाणे आपल्या विषारी विळख्यात सर्वांना ओढून घेत आहे. आपण आणि आपला समाज या संकटापासून वेळीच सावध झालो नाही तर आपण आपले जीवन उद्ध्वस्त करून देशालाही गमावून बसू यात काही शंका नाही.

तेव्हा मादक पदार्थाची विक्री थांबवण्याची ची व त्याची ची विक्री करणाऱ्याला कडक शासन करण्याची गरज आहे. व्यसनमुक्तीसाठी समाज व सरकार या दोघांची ही फार मोठी जबाबदारी आहे. व्यसनाच्या दुष्परिणाम बद्दल लोकांना योग्य शिक्षण देण्याची गरज आहे. मनोरंजन, क्रीडा, नाट्यसंस्था, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी सारख्या उपक्रमास व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे म्हणजे या समस्यांची तीव्रता कमी होईल. मादक पदार्थांच्या सेवनामुळे वैयक्तिक आरोग्य व सामाजिक स्वास्थ्यही बिघडते.

—-सौ. भारती दिनेश तिडके
रामनगर, गोंदिया
8007664039.