२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेच पूजन करुन त्यांचे स्मरण केलेच पाहीजे

33

२६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. तो राष्ट्रीय सण आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे .म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर,राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले ? तर त्या दिवसापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या व देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्याकारभार सुरु झाला. म्हणजे संविधानाची अमलबजावणी २६ जानेवारीपासून सुरु झाली. त्यालाच प्रजासत्ताक दिन म्हणतात. हा दिन कोणामुळे सुरु झाला ? भारतीय संविधानामुळे. भारतीय संविधान कोणामुळे निर्माण झाले ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग, ज्यांनी संविधान लिहिले त्यांचे स्मरण प्रजासत्ताक दिनी या देशाला झालेच पाहिजे. त्यांना संपूर्ण देशाने वंदन आणि अभिवादन केलेच पाहिजे. प्रजासत्ताक दिनी जो संविधानाला मान, तोच मान संविधान निर्मात्याला, जन्मदात्याला, घटनेच्या शिल्पकाराला दिलाच पाहिजे.

म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी, प्रत्येक संस्था- संघटनांनी, शाळा- कॉलेज आणि मंडळांनी संविधानाचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदराने आणि अभिमानाने अभिवादन केलेच पाहिजे. जेथे जेथे राष्ट्राध्वजारोहण करून प्रजासत्ताकदिन साजरा केला जातो तेथे तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात यावा. आज पर्यंत तसे कोणी केले नसेल. आतापासून आपण करूया. ज्यांनी केले व जे करीत आहेत, त्यांचा कित्ता आपण गीरवूया. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करा, काही ठिकाणी अशी प्रथा सुरु झाली आहे आता आपण सुरु करूया, शासन सुरु करील याची वाट पाहत बसू नये.
डॉ. बाबासाहेबांबद्दल शासनाला नेहमीच उशिराच जाग येते. म्हणून आपण जागे राहूया आणि शासनाला जागे करूया. आपण केले कि तो शासनाला निर्णय घ्यावाच लागतो. इंदू मिलचे आंदोलन आपणच केले ना ? मग शासनाला जाग आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचे संविधान लिहून पूर्ण केले व देशाला अर्पण केले.

ज्या दिवशी संविधान देशाला अर्पण करण्यात आले तो २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ आणि ज्या दिवसापसुन संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली तो २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन ‘२००८ पासून महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली. तेव्हापासून संपूर्ण राज्यात २६ नोव्हेंबर रोजी शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यात येतो. आता शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा करावा. असा जी. आर. काढावा. शासन करील तेव्हा करील. आपण मात्र आता पासून सुरुवात करू आणि डॉ. बाबासाहेब किती मोठे आहेत ते या देशाला पटवून देवूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण या देशातील जातीयवाद्यांना खुपते आहे. म्हणून तर ते नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुल्लेख टाळतात. अनेक गोष्टींचा खोटा इतिहास सांगतात. डॉ. बाबासाहेबांबद्दल त्यांना खरा इतिहास सांगता येईना. कारण डॉ. बाबासाहेबांनी खरा इतिहास लिहून ठेवला व नवीन इतिहास रचला. त्याचे जतन करण्यासाठी जनता जागृत आहे.

म्हणून तर ते डॉ. बाबासाहेबांचा अनुल्लेख टाळतात किंवा ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठेपण, महत्व आणि कर्तृत्व सिद्ध करण्याचा दिन आहे, त्याचदिवशी हे जातीयवादी कपटकारस्थानाने नवीन सन किंवा नवीन धार्मिक प्रथा सुरु करतात. हेतू हाच कि त्या दिवशी डॉ. बाबासाहेबांच्या मोठेपणाकडे किंवा कर्तुत्वाकडे लोकांचे लक्ष जावू नये किंवा लोकांना कळूच नये. उदाहरण द्यायचे झाले तर २६ जानेवारीचे देवूया. गेल्या ८ ते ९ वर्षापासून २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी सत्यानारायनाच्या पूजा घालण्यात येवू लागल्या आहेत. या पूजांचे एवढे अवडंबर माजले आहे कि, प्रत्येक गल्लीत हि पूजा होवू लागली आहे. यापूर्वी २६ जानेवारी रोजी का सत्यनारायणाची पूजा घातली जात नव्हती? आणि आताच ती का घालण्यात येते? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व त्यांना वाढू द्यायचे नाही किंवा कमी करायचे आहे. सत्यनारायणाच्या पूजेचा आदेश दिला कोणी ? व आला कुठून ? तर तो थेट नागपूरच्या हेडक्वार्टरहून आला. कुणाला कळाले नाही. कुठेही गाजावाजा नाही. पण अंमलबजावणी मात्र सर्वत्र होत आहे. प्रजासत्ताक दिनी सत्यनारायण पूजेचे महत्व वाढत आहे, वाढवीत आहेत. म्हणून आपल्या सर्व भारतीयांची जबाबदारी वाढत आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे महत्व गर्जत आणि गाजत सांगितले पाहिजे.

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे. राष्ट्रध्वज हातात घेवून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुका काढल्या पाहिजेत. जातीयवाद्यांना डॉ. बाबासाहेबांचा खोटा इतिहास सांगता येत नाही. म्हणून ते डॉ. बाबासाहेबांचे महत्व कमी करू लागले आहेत. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलेच नाही असे त्यांना सांगता येत नाही. म्हणून ते आता सांगु लागले आहेत कि, भारताचे संविधान हे काही डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांनी एकट्याने लिहिले नाही. सात जणांच्या घटना समितीने लिहिले आहे. तेंव्हा आंबेडकरवाद्यांनी त्याचवेळी,तिथल्या तिथेच एका क्षणाचाही विलंब न लावता ठणकावून ठामपने सांगितले पाहिजे की, होय.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच भारतीय संविधान लिहिले आहे. तेच संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी. पी. खेतान, कृष्णास्वामी अय्यर, बी. एल. मित्तल, के. एम. मुन्शी व सय्यद अहमद अब्दुल्ला हे सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते.

घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वातंत्र्यपूर्व) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३८९ सदस्य होते तर स्वातंत्र्यानंतर १९४७ साली (स्वातंत्र्योत्तर) फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते, असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीन जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोघेजण परदेशात गेले. अन्य दोघे सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकचे निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्त होता.

जय संविधान – जय भारत

✒️लेेेखक:-मा.पी.डी.पाटील सर
महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव.