शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या प्रश्नावर आम आदमी पार्टी आक्रमक

30

🔹सक्ती नको, आधी उत्तरे द्या. चिमूर येथे उप अभियंत्यांना ‘आप’ ची प्रश्नावली सादर

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.28मार्च):-दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा निसर्गाने साथ न दिल्यामुळे विकोपास गेलेली शेती, कोरोना काळातील संचारबंदी मुळे मोळकळीस आलेला संसार यामुळे हवालदिल झालेला शेतकरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या चुकीच्या वीजबिल धोरणामुळे पुन्हा अर्धमेला झालेला आहे. सरकारच्या या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना वीज न वापरता अव्वा च्या सव्वा बिल आलेले आहे. तीन एच पी ची मोटर पंप वापरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पाच एच पी चे बिल आलेले आहे. भरमसाठ व्याज, मीटर बंद असूनही फुगलेले बिल यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक करून पैशे उकळण्याचा सरकारचा डाव आहे असे जाणवते.

शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्येवर चर्चा करण्याकरिता चिमूर विधानसभा क्षेत्रातील गावांमधील अनेक शेतकरी आम आदमी पार्टी चे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर येथील उप कार्यकारी अभियंता कार्यालयात धडकले. उग्र झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्येवर अधिकार्यांना उत्तरे मागण्यात आली यादरम्यान आम आदमी पार्टी तर्फे जाहीर केलेली प्रश्नावली अधिकार्यांना सादर करून ‘सक्ती नको, आधी उत्तरे द्या’ असे बजावण्यात आले.

शेतकरी हा ग्राहक असून वीज वितरण कंपनी आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बाध्य आहे. आमचे समाधान झाल्याशिवाय शेतकरी वीजबिल भरणार नाही असे जाहीररीत्या अधिकार्यांना आप तर्फ्रे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनी तर्फे लाव्यात आलेल्या मीटर वरून मीटर रीडिंग प्रमाणेच वीजबिल का आकारण्यात येत नाही ? अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी या तीन एच पी च्या असून त्यांना पाच एच पी चे बिल भरावे लागत आहे. यात होत असलेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार ? अश्या तक्रारींची दखल का घेतली जात नाही ? नादुरुस्त असलेल्या मीटर, फ्युज व फेज ची जबाबदारी कोणाची आहे ? यावर त्वरित कारवाही का केली जात नाही. शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या विजेच्या वेळांमध्ये वेळोवेळी बदल का करण्यात येतो ? ठरविलेल्या वेळेत अखंड वीजपुरवठा का होत नाही? सरसकट वीजबिल आकारणी मध्ये नमूद असलेल्या अधिभारांची नेमकी माहिती आम्हास सादर करावी. असे अनेक प्रश्न दिलेल्या प्रश्नावली मध्ये विचारण्यात आलेत.

याप्रसंगी २५० च्या वर शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन अधिकार्यांना देण्यात आले. प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या नेतृत्वात अचानकपणे धडकलेल्या शेतकऱ्यांच्या या मोर्च्यात माणिक पिसे, विशाल इंदोरकर, चंद्रशेखर कामडी, डॉ. सुनील पिसे, रंगनाथ कामडी, दत्तुजी ढोले, संभा कामडी, भास्कर बारसागडे, भिमरावजी कामडी, रमेश मसराम, सदाशिव सोनवणे, श्रीराम मसराम, गंगाधर श्रीरामे, महादेव भेंडारे, गिरीधर कामडी, मोती पिसे, लहू श्रीरामे व अनेक शेतकरी उपस्थित होते.