जिवती ग्रामीण रुग्णालयाचे काम कासवगतीने- तालुका वासीयांचे स्वप्न दोन वर्षांपासून धुळीस

29

🔸जिवती ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकडे प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.29जून):-तालुका हा अत्यंत मागासलेला असुन येथील जनता दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्यास आहे. येथील दऱ्याखोऱ्यामुळे जनता पायाभूत सुविधेपासून वंचित आहे. त्यातच सरकारी योजना देखील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याची बाबी समोर येत असतानीच, जिवती तालुक्यातील जनतेला अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचे माजी आमदार संजय धोटे यांचे स्वप्न प्रशासकीय दिरंगाई, स्थानिक लोकप्रतिनिधींची अक्षम्य अनास्था यामुळे धुळीस मिळालेले दिसत आहे. तालुक्यात आतापर्यंत कोविडमुळे अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत, कित्येकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या महामारीत जनतेला संजीवनी देऊ शकणारे जिवती ग्रामीण रुग्णालय भूमीपूजनापासून दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आपत्ती काळातही ग्रामीण रुग्णालय अपूर्ण राहिल्याने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

माजी आमदार संजय धोटे यांनी मोठ्या दिमाखात 2 आगस्ट 2019 रोजी जिवती ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते. व नंतरच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने भरभरून मतदान दिले, त्या वेळी जनतेच्या आरोग्या सारख्या मुलभूत प्रश्‍नावर स्थानिक लोकप्रतिनिधी काहीतरी करतील ही भाबडी आशा जनतेच्या मनात होती. जिवती साठी तर दस्तूरखुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न तालुक्यातील जनतेस दाखविले होते. जिवतीचे ग्रामीण रुग्णालय तरी दोन वर्षात पूर्ण होईल ही आशा करणे स्वाभाविक होते. संजय धोटे यांनी भूमिपूजना वेळी दिलेली आश्‍वासने आजही प्रत्यक्षात येऊ शकलेली नाहीत.

कोविडच्या पहिल्या लाटेत प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि यंत्रणेचा आधार घेत मोठमोठी जम्बो कोविड रुग्णालये उभी केली. मात्र दोन वर्षांपूर्वी निधीसह मंजूर असलेले ग्रामीण रुग्णालय या पार्श्‍वभूमीवर तातडीने पूर्ण करुन जनतेसाठी खुले होईल या बाबतीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन स्तरावर अनास्थाच राहिली. याचा परिणाम जिवती तालुक्यातील जनतेला भोगावा लागत आहे. कित्येक रुग्ण गंभीरआजाराच्या उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा नजीकच्या तालुक्यांवर अवलंबून आहेत. मात्र तिथेही व्यवस्था न झाल्यास नागपूर, वर्धा, लातूर, नांदेड येथील रुग्णालयांवर अवलंबून राहण्यावाचून पर्याय उरत नाही. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आर्थिक स्थिती असो वा नसो लोक पदरमोड करून अन्य ठिकाणी रुग्णांना घेऊन जातात हे चित्र गेली कित्येक वर्षे कायम आहे. या प्रवासात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ओढाताण, शारीरिक – मानसिक त्रास होतो तो तरी टळला असता. मात्र जिवती ग्रामीण रुग्णालय किमान वापरात येईल एवढे तरी कार्यान्वित करावे अशी इच्छा ना प्रशासनाला झाली, ना लोकप्रतिनिधींना त्याची गरज वाटली. या दुष्टचक्रात जनता मात्र भरडत चालली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायद्याने प्रशासनाला व्यापक अधिकार दिले आहेत.

कोविड महामारी आणि जनतेचे आरोग्य हाच प्रशासनासमोरील प्रमुख अजेंडा आहे. राज्यशासन स्तरावर होणाऱ्या बैठकांमधून नेतेमंडळी प्रसारमाध्यमांना वारंवार हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असली तरी, स्थानिक प्रशासकीय पातळीवर त्याचे प्रतिबिंब मात्र दिसत नाही.ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम हे त्याचेच द्योतक आहे. पण जिवती ग्रामीण रुग्णालय काही कार्यान्वित होताना दिसत नाही. जनतेच्या जीवावर उठणारी ही अक्षम्य दिरंगाई आणखी किती काळ चालणार? आतापर्यंतच्या कोविड बळींना ही दिरंगाई भोवली आहे. कोविडची तिसरी लाट येण्यापुर्वी तरी जिवती ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने ,वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसह कार्यान्वित व्हावे तरच जिवतीवासीयांना आरोग्य सेवांच्या बाबतीत दिलासा मिळेल.