अध्यक्ष महोदय, विधानसभा पाडून टाका

33

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसात गुंडाळले गेले. अधिवेशनाच्या दोन दिवसात विधानसभेत जे घडले ते राज्याच्या लौकीकाला, परंपरेला गालबोट लावणारं होतं. गेल्या काही वर्षात ते सातत्याने घडते आहेच पण यावेळी कहर झाला. पान टपरीवर, नळावर आणि रस्त्यावर जे चित्र दिसतं तेच विधानभवनात घडले. गेल्या काही वर्षात आमदार नावाच्या टवाळखोरांनी विधानसभेला पान टपरीच्या आणि कुचाळकट्ट्याच्या दर्जावर आणून ठेवलय. तिथं हमरी-तुमरी होते, तिथे गाढवासारखा गोंधळ होतो. तिथे परस्परांचे गचुरे धरले जातात. जे नेहमी नळावर, टपरीवर, चौका-चौकातल्या कुचाळकट्यावर घडते तेच विधानसभेत घडते आहे. परवा विधानभवनात अध्यक्षांच्या दालनात हलकटपणाची पातळी पार करून शिवीगाळही झाली.

विधानसभेच्या अध्यक्षाचीच आय-बहिण काढली गेली. या प्रकारात भाजपाचे बारा आमदार निलंबीत केले गेले. अलिकडे सगळ्याच पक्षांना टवाळखोरीचा रोग जडलाय. विधानसभेचे अधिवेशन म्हणजे दंगा करणे, आरडा-ओरडा करणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे अशातले प्रकार होत आहेत. यात सर्वपक्षीय सामिल आहेत. एकाला झाकावे आणि दुस-याला काढावे अशी त-हा आहे. जे विरोधकाच्या खुर्चीत बसतात ते या पातळीवर उतरतातच. सभ्यतेचा फार आव आणणा-या भाजपाच्या आमदारांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडत अध्यक्षाला शिवीगाळ केली. त्यांनी उरली-सुरलीही घालवून टाकली. विधानभवनाच्या लौकीकालाच हरताळ फासलाय. म्हणूनच अध्यक्ष महोदय विधानसभेची आता काही आवश्यकता उरलेली नाही, ती आता पाडून टाका !

विधानभवनात आमदार म्हणूण येणार टवाळखोरांना भांडायला, एकमेकांच्या अंगावर जायला, शिवीगाळ करायला राज्याच्या काना-कोप-यात हजारोने पानटप-या आहेत, नळ आहेत, चौका-चौकातले कुचाळकट्टे आहेत. हे तमाम टवाळखोर तिथे गोळा होतील, एकमेकांची आय-बहिण काढतील, गचुरे धरतील, मारामारी करतील. त्यासाठी विधानसभेची गरज उरली नाही. काही अपवाद वगळता आता विधान भवनात जावून लोक कल्याणाच्या कामाचा, लोकहिताचा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरण ठरवण्याचा, त्यासाठीचे कायदे करण्याचा विचार मांडला जात नाही. अलिकडे फक्त आणि फक्त गोंधळ घातला जातो. तिथे कुणाला बोलू दिले जात नाही आणि बोलणाराचे ऐकले जात नाही. त्यामुळे अशा गाढवांना राज्याच्या काना-कोप-यातले चौक आणि त्या चौकातले कुचाळकट्टे रिकामे आहेत. त्यांनी विधानसभेऐवजी या चौका-चौकात गोळा व्हावे. तिथे खुषाल एकमेकांची आय-बहिण काढावी. परस्परांचे गचुरे धरावेत. एकमेकांना पायताणाने मारावे.

शक्य असेल तर सुरा-चाकू घेवून जावे. एकमेकांना भोकसून मारावे. येणा-या काळात विधानभवनाच्या इमारतीत असले उद्योगही घडतील. ते घडू नयेत, ती खेदजनक वेळ येवू नये म्हणूनच अध्यक्ष महोदय विधानसभा पाडून टाका. काही आवश्यकता उरली नाही त्याची. विधान भवनाच्या इमारतीलाही आता ही अवकळा पाहवत नसावी. ज्या विघानभवनाने अनेक नामवंत नेते पाहिले, त्यांची अभ्यासपुर्ण भाषणे ऐकली, त्यांची सभ्यता, त्यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची उंची पाहिली, त्यांची सहिष्णूता पाहिली, त्यांच्या मनाची व्यापकता, जनतेप्रतीची तळमळ पाहिली त्या विधानभवनाला ही टवाळखोरी पाहून हूंदका दाटत असेल. त्या विधान भवनाच्या भिंती आतल्या आत आक्रंदत असतील, स्फुंदत असतील. त्यांचा श्वास गुदमरत असेल. त्यांची त्यांनाच शरम वाटत असेल म्हणूनच अध्यक्ष महोदय विधानभवनाची गरज नाही. एक तर ते पाडून टाका नाहीतर तिथे अधिवेशन घ्यायचे बंद करा.

गेल्या दहा-पंधरा वर्षात अधिवेशनातल्या कामगिरीचा दर्जा खालावत चाललाय. बहुतेक वेळ हा गोंधळात जातो. कानकाज होतच नाही. गोंधळ घालून अधिवेशनच गुंडाळले जाते. पुर्वी सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची खुप अभ्यासपुर्ण भाषणं व्हायची. सत्ताधारी विरोधकांना गांभिर्यांने ऐकायचे. विरोधकही गांभिर्याने, जबाबदारीने वागायचे. तेव्हाही विरोधक आक्रमक होते पण खूनशी किंवा आक्रस्ताळे नव्हते. ते टवाळखोरी, झुंडशाही न करता राज्याचे व जनतेचे हितच पहायचे. त्यासाठी पक्षभेद, वैचारिक भेद बाजूला ठेवून एकवटायचे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्यात मतभेद असले तरी ते विचारांचे होते. सध्या विधानभवनातले वाद पाहिले की फाळकुट गुंडांची आठवण येते. म्हणूनच या महाराष्ट्राने देशाला दिशा देणारे निर्णय व भूमिका घेतल्या. विधानभवनात तसे कायदे केले. राज्याने स्विकारलेले धोरण नंतर अवघ्या देशाने स्विकारले. महाराष्ट्राच्या विधानसभेतले अनेक कायदे देशाने स्विकारले. हा वारसा राज्याच्या विधानसभेचा आहे. तिथे जर हलकटपणा चालणार असेल तर ती त्या इमारतीची अवहेलना आहे. अध्यक्ष महोदय पुरे आता ही अवहेलना.