विज्ञान प्रसारास अर्थवाही मराठी भाषेचा डौल !

31

(डॉ.जयंत विष्णू नारळीकर वाढदिवस विशेष)

डॉ.जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. ते अचानक अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. ‘नारायण विनायक जगताप’ या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या स्पर्धेत त्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले. त्यातून त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले. स्थिर स्थिती सिद्धान्त त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.डॉ.नारळीकर साहेबांचा जन्म कोल्हापूर येथे दि.१९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर- विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांची आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. जयंतरावांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स.१९५७ साली त्यांनी बीएस्सी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले.

तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. सन १९६६ साली त्यांचा विवाह सदाशिव राजवाडे यांची सुकन्या गणितज्ञ मंगलाताई यांच्याशी झाला. त्यांना तीनही मुलीच- गीता, गिरिजा व लीलावती या आहेत. सन १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. सन १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या पत्‍नी मंगलाताई नारळीकर या ’नभात हसरे तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश- भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.चार दशकांहून अधिक कालावधीपासून डॉ.नारळीकर साहेबांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे.

सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी ‘चार नगरांतले माझे विश्व’ या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप केला. तेव्हा “विज्ञान प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे.” असे खेदाने म्हटले. मात्र लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी “कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत.” असाही शेरा त्यांनी जोडला. असे कर्तव्य ते जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने ‘व्याख्यानबाजी’ असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. त्यांचा वैज्ञानिक व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच तो संतुलित, उदार व समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे.

आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र हे पाऊल केवळ प्रतिकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यांची साहित्यसंपदा: विज्ञानकथा पुस्तके- अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस. विज्ञानविषयक पुस्तके- अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक: डॉ.अजित केंभावी आणि डॉ.मंगलाताई नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी), विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, समग्र जयंत नारळीकर- प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक, सूर्याचा प्रकोप आदी. आत्मचरित्र- चार नगरांतले माझे विश्व. ही अशी उद्बोधक आहे.विविध मराठी नियतकालिकांतून डॉ.जयंत नारळीकर साहेबांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. त्यांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त त्यांना निरामयी उदंड आयुष्याच्या अनंतकोटी हार्दिक शुभेच्छा !!

✒️शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी(संत लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक.)मु. रामनगर वॉर्ड ना.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६.