पुण्यातील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शासकीय योजनांचा आज 23 ऑगस्ट रोजी होणार शुभारंभ

29

🔸मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये लवकरच मोफत उपचार

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.23ऑगस्ट):- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा आपण सामना केला आहे. तिसऱ्या लाटेच्या बाबतीत सरकारकडून वारंवार शक्यता वर्तविली जात आहे. या कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत. कोरोनावरील उपचार घेताना काही वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. त्यामुळे रुग्णालयातील उपचाराचा खर्च भागवणं काही वेळा अडचणीचं ठरतं. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये धायरी येथे मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये लवकरच शासकीय आरोग्य योजनांमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत.

त्या अनुषंगाने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह डायलेसिस युनिटचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते २३ ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे.या बाबत बोलताना, हॉस्पिटलचे संचालक अजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेता घेता येणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी ३४ निवडक विशेष सेवा अंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा मोफत लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ कुणाला होवू शकतो?

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.