राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५०हजारांची नुकसानभरपाई द्यावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

24

🔹राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा राज्य कमिटी च्या बैठकीत रिपाइंचा ठराव मंजूर

🔸एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक असून राज्य सरकार च्या निर्णया विरुद्ध न्यायालयात दाद मागू – ना.आठवले

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

लोणावळा(दि.5ऑक्टोबर):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाच्या राज्य कार्यकारिणी ची बैठक आज लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे घेण्यात आली त्यात विविध ठराव मंजूर झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती करावी आणि भाजप ने रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक महापालिकेत जागा सोडाव्यात असा ठराव रिपाइं च्या राज्यकार्यकरिणीच्या बैठकीत मंजूर झाला. एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकार ने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे.

एक व्यक्ती एक मत एक मूल्य या संकल्पनेला छेद देणारी पद्धत आहे त्यामुळे एक प्रभाग तीन सदस्य या पद्धतीला रिपब्लिकन पक्ष तीव्र विरोध करीत असून वेळ पडल्यास न्यायालयात जाऊन एक प्रभाग तीन सदस्य पद्धतीला विरोध करू अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.

राज्यात अतिवृष्टीने मराठवाडा विदर्भ या भागात नुकसान झाले आहे.त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची नुकसानभरपाई द्यावी; दलित अत्याचार रोखण्यासाठी ऍट्रोसिटी कायद्यातील तरतुदिंची अंमलाबाजवणी करावी; महिलांवरील अत्याचार रोखवेत अत्याचार पीडित महिलांना राज्य सरकार ने ५०लाख रुपयांची मदत द्यावी; ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे या मागणीसाठी येत्या दि.२०ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर आंदोलन करणार असल्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी जाहीर केली.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुका रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावरच लढल्या पाहिजेत. त्यासाठी राज्यात विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यानी तयार करावेत. मनपा निवडणूकीत भाजप सोबत युती करून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यानी आपले मतदारसंघ मजबूत बांधावेत.बुथ प्रमुख बनवावेत. निवडणुकी जिंकण्यासाठी पक्ष राजकीय पक्ष म्हणून बांधणी करावी. राज्यात ५०लाख सदस्य नोंदणी करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.