बीडमध्ये पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

32

🔹विमा कंपन्याचा मनमानी कारभार सुरुच; तक्रारीचे अर्ज धुळखात पडून

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.4जानेवारी):-दिवसेंदिवस पीक विमा योजनेवरील शेतकऱ्यांचा विश्वासच बसत नाही. त्यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्याही घटत आहे. नेमके असे कशामुळे होत आहे तर विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे. आता रब्बी हंगाम मध्यावर आहे. शिवाय या पिकाच्या अनुशंगाने योजनेत सहभागी होण्याची मुदतही संपलेली आहे. असे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही खरीप हंगामातील पिकांच्याच विमा रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकट्या बीड तालुक्यातील 5 हजार शेतकरी हे विमा रकमेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली. एवढेच नाही गतवर्षीची देखील विमा रक्कम ही कंपन्याकडेच थकीत आहे.

विमा कंपन्याचा मनमानी कारभार

ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस पडला होता. या पावसात खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पीकविमा भरला होता. नुकसान होवूनही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. एकट्या बीड तालुक्यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहिले असून विमा कंपनीने सर्व शेतकर्‍यांना विम्याची घोषणा करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकर्‍यांनी तीव्र निदर्शने करून विमा कंपनीचा निषेध केला. यावेळी धनंजय गुंदेकरसह आदि शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

तक्रारीचे अर्ज धुळखात पडून…

पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय येथे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी अर्ज दाखल केले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात तर गेल्या 19 दिवसांमध्ये 9 हजार 352 तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, एकावरही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे अर्ज करुनही कारवाई होत नसल्यानेच बीड येथे शेतकऱ्यांनी निदर्शने केली. जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा आढावा घेऊन त्वरीत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.