केंद्रीय मंत्री दानवेंच्या वक्तव्याने राज्यातील नाभिक समाज आक्रमक.. ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने आणि निषेध….

27

✒️ठाणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

ठाणे(दि.15मार्च):-केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील सभेत नाभिक समाजाबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते.या वक्तव्याने राज्यभरातील नाभिक बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.राज्यभर दानवे यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट असून सकल नाभिक समाज दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहे.

राष्ट्रीय जनसेवा पक्ष,नाभिक महामंडळ, जिवा सेना,राष्ट्रीय नाभिक संघटना,नाभिक सेवा संघ,सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन,तालुका आणि जिल्हा पातळीवरील स्थानिक संघटना आणि विविध मान्यवर समाज कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात राज्यभर निदर्शने केली जात आहेत.

मंत्री रावसाहेब दानवे यांनी सकल नाभिक समाजाची माफी मागावी अशी जोरदार मागणी आंदोलनातून होत आहे.तहसीलदार,जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांकडे दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.दानवे यांनी माफी न मागितल्यास राज्यातील नाभिक समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाच्या तयारीत असल्याबाबत विविध संघटनांच्या वतीने आणि समाज कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.