भाजप संसदीय मंडळात मराठी नेता नसणे हा महाराष्ट्राचा अपमान भाजप नेते आनंद रेखी यांचा पक्षाला घरचा आहेर

30

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.20ऑगस्ट):-समाजकारणापासून राजकारणात अव्वल असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैली तसेच ‘व्हिजन’मुळेच जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षाला केंद्रासह अनेक राज्यात सत्तेवर बसवले आहे.देशासह जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन अशी ओळख पार्टीची आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक वारसा घेवून राजकारणात यशस्वी झालेल्या भाजपला वाढवण्यात अनेक मराठी नेत्यांचे योगदान महत्वाचे आहेत.पंरतु, भाजपच्या संसदीय मंडळात यंदा एकाही मराठी नेत्याला स्थान न दिल्याने वेगळी नाराजी निर्माण झाली आहे,असा दावा भाजपचे नेते आनंद रेखी यांनी केला आहे.

मराठी नेत्यांना पक्षाने सर्वोच्च मंडळातून डावलने हा महाराष्ट्राचा अपमान आहे,अशा शब्दात रेखी यांनी भाजपला घराचा आहेर दिला.पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या मंडळात स्थान देण्यात आलेले नाही.कार्यसम्राट गडकरींना मंडळात समाविष्ठ न करणे ही बाब अनेक मराठी माणसांसह इतर भाषिकांना दुखावणारी आहे. गडकरी सारख्या व्हिजनरी नेत्याला बाहेर ठेवल्याने पक्ष त्यांचा अभ्यास,अनुभवापासून मुकेल , असे प्रतिपादन रेखी यांनी केले. गडकरी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या मंडळात समाविष्ट करण्यात आलेले नाही.  त्यांना निवडणूक समितीत स्थान देण्यात आले असले तरी मराठी नेत्यांना पक्षाच्या सर्वोच्च समितीत समाविष्ठ न केल्याने पक्षात अंतर्गत कुजबुज सुरू असल्याचे रेखी म्हणाले.

केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वाधिक काम करणारे मंत्री म्हणून लैकिक असलेले गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला सुगीचे दिवस आले होते. गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यापासूनच पक्षाचा संघटन विस्तार तसेच देशपातळीवरील नेतृत्वाचा आलेख उंचावत गेला. फडणवीस यांनी देखील महाराष्ट्रात भाजपला सत्तेवर आणले.दिल्लीच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका आणि योगदान दुर्लक्षित करून चालणार नाही,त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घोषित केलेल्या पक्षाच्या संसदीय मंडळात गडकरींना तसेच फडणवीस यांना स्थान द्यावे, अशी मागणी रेखी यांनी केली आहे.