‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे कायद्यापेक्षा मोठे आहेत काय ?

97

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.19नोव्हेंबर):- महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या एका पुस्तकाने सध्या वादविवादांचे एक मोठे वादळ उठले आहे. ‘लोकसत्ता’ या दैनिकाचे सुजाण संपादक असलेल्या गिरीश कुबेर यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई का करू नये, असे सवाल महाराष्ट्राच्या जनता-जनार्दनाकडून केले जात आहेत. कारण, या कुबेर महाशयांनी जनतेच्या भावनांना ठेच पोहचेल असे बेताल, बिनबुडाची मुक्ताफळे सर्वार्थाने आदरणीय असलेल्या एका ऐतिहासिक अशा व्यक्तिबद्दल उधळली आहेत. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावभावनांची अस्मिता जपण्यासाठीच केवळ स्प्राऊट्स या एकमेव दैनिकाने हा ज्वलंत विषय हाती घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे तर समस्त जनतेचे आराध्य वा आराध्य दैवतच मानले जाते. त्यानंतर संभाजी महाराजांना हा मान देण्यात येतो. देशभक्तीने भारलेल्या प्रत्येकाच्या मनात, हृद्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक विशेष आदर, आपुलकीचे स्थान आहे. त्यामुळे सर्वच राजकारणी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची जपमाळ ओढत निष्ठेच्या शपथा घेतात. ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेकडून एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे कोणीएक छत्रपती संभाजी राजेंच्या पवित्र स्मृतींबद्दल काहीएक अपशब्द काढीत असेल, तर त्यास वठणीवर आणलेच पाहिजे.

तथापि, धक्कादायक म्हणजे हे प्रकरण तसे सहजपणे घेण्यासारखे किंवा पचण्यासारखे नाही. कारण, गिरीश कुबेरसारख्या माणसाने, की जो ‘लोकसत्ता’ या ‘इंडियन एक्सप्रेस ‘वृत्तपत्र समूहाच्या मराठी दैनिकाचे एक (बे)जबाबदार संपादक आहे, त्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्या पद्धतीने अवमान केला आहे, तो कोणतीही व्यक्ती क्वचितच करू शकेल. तरीदेखील अशा व्यक्तिविरोधात राज्य सरकारने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही, किंबहुना तशी कारवाईची भाषाही केलेली नाही.

स्प्राऊट्सला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, टाईम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्र समूहाचे एक माजी वरिष्ठ पत्रकार, जे आज मुंबईत एक नामांकित फौजदारी वकील म्हणून कार्यरत आहेत, त्या एस. बालकृष्णन यांनी गुरुवारी असे सांगितले की, या कुबेर महाशयांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे, की ज्याचे नाव आहे. ‘द रेनेसन्स स्टेट – द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र’. या पुस्तकातील पान क्रमांक ७६ वर एक ओळ आहे, ज्यात असे म्हटलेले आहे की, सरतेशेवटी संभाजी महाराज यांचा वारसा कोणाकडे या प्रश्नाला एकप्रकारे पूर्णविराम देतांना सोयराबाई व त्यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्यांना यमसदनी धाडले. पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की, सोयराबाई या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर संभाजी महाराजांच्या आईच होत्या. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याच आईची हत्या केल्याचा कोणताही सज्जड पुरावा मात्र या ठिकाणी देण्यात तथाकथित लेखक महाशय हे अधुरे आणि अपुरे पडलेले आहेत. किंबहुना पूर्ण उघडे अन् उताणे पडलेले आहेत. अशाप्रकारचा गंभीर आरोप कुबेर हे नेमके कशाच्या आधारे करीत आहेत, हे तर सर्वसामान्य जनतेला जरा कळू द्या.

अशाप्रकारचा रानटी, बेताल, बेछूट आरोप लेखक महाशय छत्रपती संभाजी महाराज यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल करूच कसा शकतो, याचे परमआश्चर्यच नव्हे तर प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. लोकांच्या भावनांची काहीही कदर न करणारे कुबेरसारखे संपादक महाशय हे कायदेशीर कारवाईस पात्र ठरले आहेत. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १५३, १५३-अ, १५३-ब, अन्वये त्याचप्रमाणे इतरही अनेक संदर्भित कलमांन्वये कुबेर महाशयांवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. हे सर्व लिखाण प्रक्षोभक, जनसामान्यांच्या भावना दुखावणारे आणि लोकभावनेस तडा देणारे असल्याकारणाने पोलिसांनी आपल्या कर्तव्याला जागून तथाकथित लेखक वा संपादक कुबेर यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल अर्थात एफआयआर हा दाखल केलाच पाहिजे.

बालकृष्णन यांनी २६ मे, २०२१ रोजीच म्हणजे मविआ सरकार सत्तेवर असतानाच चेंबूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केलेली आहे. त्या काळातील अनेक वरिष्ठ राजकारणी मंडळींना गाठून याप्रश्नी आवाज उठविण्याचा प्रयत्न बालकृष्णन यांनी केला, मात्र कोणत्याही राजकीय धुरंधराने सोयीस्कर दुर्लक्ष करीत हे प्रकरण हाती घेण्याचे टाळले आहे, ते केवळ पत्रकार बालकृष्णन यांच्याशी आपला घरोबा असल्याचे दिसून येऊ नये म्हणून.

जर एफआयआर दाखल करण्याकामी राज्य सरकार चालढकल करीत असेल तर, मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावेन, पण छत्रपती संभाजी महाराजांसारख्या श्रेष्ठ, आदर्श अशा व्यक्तिमत्वाबद्दल अवमानकारक लिखाणप्रकरणी एफआयआर हा दाखल करूनच घेईन,असा पुनरुच्चार बालकृष्णन यांनी शेवटी केला आहे.