जनहित साधक ठरो, सार्वजनिक गणेशोत्सव!

87

(गणेश चतुर्थी ते गणेश मूर्तीविसर्जन विशेष)

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सवाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं. सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात. तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला शुद्धसात्विक मनाने निरोपही दिला जावा, अगदी सूज्ञ होऊन. या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनापासून तर मूर्तीच्या निरोपापर्यंतच्या दिवसांची म्हणजेच गणेशोत्सवाची माहिती मराठीत सांगणारा अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींचा हा लेख खास गणेश भक्तांसाठी…

“गजानना तू गणराया।
आधी वंदू तुज मोरया।।”

भारतीय सौरवर्षानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेशचतुर्थी साजरी केली जाते. असे मानले जाते, की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती अर्थात गण+पती = गणांचा अधिपती या देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी वर्षानुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो, तो चार्तुमासाचा काळ असतो. चार्तुमास हे चार महिने अनेक सणांनी युक्त असतात. संपूर्ण भारतासह विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी अकरा दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करतात. योग्य माहिती घेऊन जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वतीपुत्र गणपती या बुद्धीच्या देवता आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्यदेवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसेच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला जातो. कोणतेही शुभकार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यापैकीच एक नाव विघ्नहर्ता- दुःखहर्ता अर्थात संकटाचे हरण करणारा असे आहे. म्हणून म्हटले जाते-

“तुच सुखकर्ता, तुच दुःखहर्ता।
अवघ्या दीनांच्या नाथा।
बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा।।”

तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते. या देवतेच्या अवतरणाची कथा अशी-

पार्वती मातेला स्नानासाठी जायचे होते. परंतु आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा तिने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवून ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी म्हणून नेमले व सांगितले, की कोणालाही आंत येऊ देऊ नकोस. भगवान शंकर काही वेळाने तेथे आले आणि ते आत जाऊ लागले, तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले व त्यांनी त्या पहारेकऱ्याचे शिर धडावेगळे केले. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आल्या, तेव्हा हा प्रकार पाहून त्या संतापल्या व अख्खे ब्रह्मांड हादरवून सोडले. अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या कोणाचे काहीही ऐकून घेत नाहीत. तेव्हा शंकर महादेव आपल्या गणाला आदेश देतात, की पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचे शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचे शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानसपुत्र गज- हत्ती व आनन- मुख धारी म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश- गणेश नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे या चतुर्थीला गणेशचतुर्थी म्हणून महत्त्व आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीची माहिती ही मराठीतही असणे आवश्यक आहे-

“पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा|
ताशाचा आवाज तर्रर्ररऽऽऽ.. झाला|
अहो, गणपती माझा नाचत आला||”

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका, तर आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावे म्हणून सुवासिनी हे व्रत करतात. या दिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जळ व्रत करून हा उपास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते. या दिवशी खास हरतालिका शुभेच्छा कुमारिकांना दिल्या जातात. गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि सुरूवात होते ती गणेशोत्सवाच्या पर्वाला. गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री आणि नेवैद्य आदी सोळा उपचारांनी षडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुले, शमी आणि दुर्वा तसेच विविध पानेपत्री या पूजेमध्ये वापरली जातात आणि या संस्कृत स्तोत्राचा उद्घोष केला जातो-

“ॐ गं गणपती नमो नमः|
श्री सिद्धीविनायक नमो नमः||
अष्टविनायक नमो नमः|

गणपतिबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||”
या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीसोबतच त्याचे वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो. तेव्हाच गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. पूजेतील महत्वाच्या गोष्टी-

दुर्वा: गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी २१ दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला साकडे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपविला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडता झाला. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिला जातो. जास्वंद: दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचे लाल फूल. कारण गजाननाचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे त्याच्या पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे त्यास जास्वंदाच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो. त्याचा आवडता नैवद्य मोदक: श्री गणेशाला सर्वात प्रिय असणारा नैवद्य म्हणजे मोदक होय. त्याला ११ किंवा २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचे सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केले जातात किंवा तळणीचेही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणेश महाराज चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून- उंदराच्या पाठीवरून जात होते. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरून भीतीने थरथरू लागला. त्यामुळे गणराय उंदरावरून खाली पडले. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. त्यांनी ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला, म्हणून गणेशजीने त्याला शाप दिला, की चतुर्थीला कोणीही चंद्राचे दर्शन घेणार नाही. जो त्याला बघेल, त्याच्यावर चोरीचा आळ येईल! अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोक चतुर्थीला चंद्राकडे बघणे निषिद्ध मानतात.

गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते. प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्ती विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते. तिथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षडशोपचारे पूजा केली जाते. उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. कारण हा गणपतीला आवडता प्रसाद आहे. गणेश चतुर्थीला पारंपारिकरित्या तांदूळ, गूळ आणि नारळ यांच्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नैवेद्य असतात. मग यंदा आपणही गणेशोत्सवाची इत्यंभूत माहिती घेऊया. मूर्ती शाडूमातीची आणू, जी लवकर विरघडेल. बाप्पाच्या उत्सवभर मादकपदार्थ सेवन व धुम्रपान बंदी ठेवू, ज्यामुळे हाणामारी व झगडे होऊ नयेत. एक गाव, एक गणपती अमलात आणू. कला कौशल्यपूर्ण व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करू. वाद्य व ध्वनीक्षेपक यांचे आवाज कानठळ्या बसविणारे नसतील, कारण विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊन अभ्यास बुडतो. रात्री दहानंतर शांतता राखू. घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच बादलीत करू. सार्वजनिक मूर्तींसाठी कृत्रिम हौद तयार करून तेथे विसर्जन उत्साहात करू. कारण नदी, नाले, तलाव यांतील पाणी स्वच्छ ठेवणे आपले गावकऱ्यांचे परमकर्तव्य बनते. पूजेतील निर्माल्य- पानेपत्री, पुष्प, हार, तुरे, तोरण, अक्षदा, प्रसाद आदी साहित्य पाण्यात विसर्जित न करता ते एकत्रितपणे खड्ड्यांत पुरू. गटबाजी व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भडकावू घोषणांना आवर घालू. कोरोनानंतरच्या या काळात पुन्हा एकदा अशा हितकर नियमांचे पालन करत जल्लोषाने गणेश चतुर्थीसह गणेशोत्सव व गणेश मूर्तीविसर्जन साजरे करू चला. लाडका गणपती बाप्पा नियमांचे पालन करण्यास सर्वांना बुद्धी देवो! बुद्धीदाता गणेश सर्वांना अशी सुमती प्रदान नक्कीच करेल, या अपेक्षेसह-

“ओंकार प्रधान रूप गणेशाचे!
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू!
मकार ते रूप महेशाचे!!”गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

!! गणेशोत्सव निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.गडचिरोली, फक्त व्हॉटसॲप नं- ९४२३७१४८८३