शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांचे मनोगत

150

शेवगाव न्यु आर्ट्स,कॉमर्स अड सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थी असतांना आम्ही कथा,कविता लिहित,काही प्रसिद्ध होत तर काही परत येत.त्यावर उपाय म्हणून आपणच घडीपत्रिका स्वरुपात मासिक सुरु करावे असे वाटल्याने त्यावेळी भगवान राऊत,शहनाज सध्याची शर्मिला गोसावी,श्रीनिवास गोरे व मित्रांसह प्राचार्य शिवाजीराव देवढे,कविवर्य लहू कानडे,प्रा.सुधीर शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडीपत्रिका सुरु केली.

या घडीपत्रिकेतील कवितेला साजेसे चित्र विजया पारेकर,दिलीप शहापूरकर काढत. पुढे शब्दगंध मासिक च्या वतीने काही चांगले दिवाळी अंक काढले.या प्रवासात प्रा.डॉ.शंकर चव्हाण,राजेंद्र उदागे,भारत गाडेकर,भेटले.प्रा.सुधीर शर्मा यांनी शब्दगंध चळवळीची स्थापना करुन नोंदणीकृत करण्यासाठी प्रोत्साहन दिले अन् ‘ शब्दगंध साहित्यिक परिषद ’ सुरु झाली.

पहिल्या वर्षी व्ही.आर.डी.ई चे तत्कालीन सहसंचालक श्री.प्रमोदजी देशपांडे साहेब परिषदेचे अध्यक्ष झाले.लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात पहिले राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन डॉ.सुधाताई कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट गीतकार कविवर्य बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले,त्यावेळी जाहीर अवाहन करुन सभासद वाढवले. जे सभासद झाले त्यांना संमेलनामध्ये गौरविण्यात आले.दरवर्षी अशा साहित्यिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सभासद वाढत असून ती संख्या आता ३०० पर्यंत पोहचली आहे.

काव्यसंमेलन,कथा-कथन, पुस्तक प्रकाशन समारंभ, परिसंवाद,चर्चा सत्र,कथा कविता लेखन कार्यशाळा,छायाचित्र प्रदर्शन या सारखे वेगवेगळे उपक्रम सुरु ठेवले, त्यामुळे शब्दगंध ला जनमाणसांचा आधार लाभला.शब्दगंध हे नवोदितांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे विचारपिठ व्हावे यासाठी आमचे सामुहिक प्रयत्न आता यशस्वी होत आहेत.

आता पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रमोद देशपांडे,प्रा.सुधीर शर्मा,प्राचार्य शिवाजीराव देवढे,प्राचार्य चंद्रकांत भोसले, प्रा. डॉ.शंकरराव चव्हाण आणि आता राजेंद्र उदागे अध्यक्ष लाभले आहेत,या सर्वांनी सहकार्य केल्यामुळेच शब्दगंध सर्वदूर पसरले आहे.उपेक्षित वंचित समाज घटकांच्या जीवनाचे वस्तुनिष्ठपणे शब्दचित्रण करुन शब्द हुंकाराच्या माध्यमाने मांडणारे शब्दगंध हे विचारपीठ व्हावे, सामाजिक संदर्भ आणि साहित्यिक पैलुचे ही विचारमंथन व्हावे यासाठी आज पर्यंत चौदा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.संमेलनानंतर पुढे काय ? या कायम पडणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून प्रतिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले.ज्या नवोदित लेखक कविनी संमेलनामध्ये सहभाग घेतला त्यांच्या संमतीने, आर्थिक सहकार्याने हा उपक्रम दरवर्षी राबवला गेला.

वेगवेगळ्या संमेलनाच्या वेळी गझलसम्राट भिमराव पांचाळ यांची ‘‘मैफल’’,प्रभाकर पणशिकरांचा ‘‘मी प्रभाकर पणशिकर बोलतोय’’ सारखा दर्जेदार कार्यक्रम,विश्‍वकोषाच्या अध्यक्षा डॉ.विजया वाड,डॉ.आ.ह.साळुंके,भाई वैद्य,प्रा. डॉ.सदानंद मोरे, प्रा.डॉ.रावसाहेब कसबे,पद्मभूषण डॉ.रजनिकांत आरोळे, कविवर्य निरंजन उजागरे,प्रा.डॉ.ऋषीकेश कांबळे,डॉ.अरविंद संगमनेरकर, चित्रपट कलावंत मिलिंद शिंदे,प्रकाश धोत्रे,राधाकृष्ण कराळे,प्रा.डॉ.जयदेव डोळे, प्रा.डॉ.मिलिंद कसबे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन, माजी मंत्री कै.आर.आर.पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, साहित्यिक लक्ष्मण गायकवाड, विठ्ठल कामत, प्रा.डॉ.अलिम वकील,खलील मोमिन,प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी,दिशा शेख,डॉ. संजीवनी तडेगांवकर सारख्या मान्यवरांच्या वक्तृत्वाचा लाभ साहित्यिकांना घेता आला.या चौदा संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणुन पद्मश्री पोपटराव पवार,लता पवार, अ‍ॅड.अभय आगरकर,महापौर संदिप कोतकर, शंकरराव घुले,नंदकुमार पवार,डॉ.निलेश शेळके,डॉ.रावसाहेब अनभुले,मा.आ.राजीव राजळे,श्री. ज्ञानदेव पांडूळे,प्रा.गणपत चव्हाण,श्री.राजेंद्र उदागे,श्री.मच्छिंद्र लंके पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली.
तर संमेलनाध्यक्ष म्हणून श्री.नामदेवराव देसाई,प्राचार्य शिवाजीराव देवढे,श्री.डि.एम.कांबळे,डॉ..कुमार सप्तर्षी, डॉ.संजय कळमकर, प्रा.फ.मु.शिंदे, श्री.प्रकाश घोडके, प्रा.प्रशांत मोरे, श्री.लहू कानडे, प्रा.इंद्रजीत भालेराव,प्रा.डॉ. अशोक शिंदे,श्री.भारत सासणे,अ‍ॅड.डॉ. बाळ बोठे पाटील यांना सन्मानित करण्यात आले.उद्घाटक व समारोपाचे पाहुणे म्हणून यशवंत भालकर,आ. अरूणकाका जगताप,अ‍ॅड.रावसाहेब शिंदे,कॉ. गोविंदभाई पानसरे,प्राचार्य द्वारकानाथ अष्टेकर,श्री.अरुण म्हात्रे,अभिनेत्री विभावरी प्रधान,कॉ.डॉ.भालचंद्र कांगो,मा.खा.यशवंतराव गडाख,प्रा.कॉ.तानाजी ठोंबरे,मा.न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील,मा.खा.प्रकाश आंबेडकर,प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर,कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. . कोणाला टाळणे किंवा गटातटाचे साहित्यिक निर्माण करणे ही शब्दगंध ची भुमिका नसून जे येतील त्यांच्यासह जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय साहित्यिक उपक्रम राबवत आहेत.त्यामुळे कोणाबद्दलही आकस नाही. विचारांची स्पष्टता असल्यामुळे वैचारिक गोंधळ नाही.आम्ही आचार विचारा तून पुरोगामित्व सिध्द केले आहे.

अनेक जण जाती प्रथेला मुठमाती देणारे या चळवळीमध्ये कार्यरत असल्याने ही एक जमेची बाजु आहे.नवोदित लेखक,कविंच्या पुस्तकाचे प्रकाशना साठी महानगरात जावे लागे त्यावर विचार विनिमय करुन ‘‘शब्दगंध प्रकाशन’’ स्वतंत्रपणे सुरु करुन आत्तापर्यंत २५० पुस्तक प्रसिध्द केली आहेत.त्यातील काही पुस्तकांची शासना कडून खरेदी झाली तर काही पुस्तकांना राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.आता आय.एस.बी.एन.नोंदणी क्रमांकासह पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्यामुळे नवोदितांना हे हक्काचे विचारपीठ मिळत आहे. माणुस माणसापासुन दुरावत चालला आहे.संपर्काची साधने वाढली आहेत.सामाजिक स्थित्यांतरे होत आहेत.आशा वेळी साहित्यिक चळवळ वाढली तरच माणसं माणसांकडे येत जात राहतील,अनेकांच्या साक्षीने शब्दगंध चा हा साहित्यिक उपक्रम पुढे जावू शकेल यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठबळाची आजही आवश्यकता आहे.

✒️सुनील गोसावी(संस्थापक)मो:-९९२१००९७५०