वजन काट्याच्या मापात खोट पडताळणी केव्हा होणार?

158

🔹वजन मापात लुबाडणूक होत असल्याचा शेतकऱ्याचा व ग्राहकांचा आरोप शेतकरी अटकतो आहे अभिमन्यूच्या फेऱ्यात

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 5 नोव्हेंबर):-भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगाला परिचित आहे पण ज्या शेतकऱ्यावर देशाची आर्थिक घडी आहे त्याच शेतकऱ्याची कोणत्यातरी माध्यमातून निवडणूक होत आहे त्याचा प्रत्यय सध्या ढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेडेगावात होताना दिसत आहे.

आजही 70 टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकरी आपली आर्थिक सुबत्ता सुधारू शकला नाही हेच येथील शेतकऱ्याचे दुर्दैव असावे…! कोणीही यावं आणि अन्याय करावा हे तर जणू देशातील कास्तकाराचे वास्तववादी चित्र बघायला मिळत असताना आधुनिकतेच्या काळानुसार सर्वच विभागात प्रगती झाली त्याला शेतीक्षेत्र सुद्धा अपवाद नाही ढाणकी शहरात व ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारा अडत व्यापाऱ्यासह इतर फिरस्ती लोक सुद्धा शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत आहे.

पण ज्या वजन काट्याद्वारे माल खरेदी होत असताना वजनमापाची वर्षातून एक वेळ पडताळणी होणे गरजेचे असते सध्या दिवाळी सणासह मळणीयंत्र चालक, सोयाबीन कापण्याची गुत्तेदारी, रब्बी हंगामातील कृषी निविष्ठेसाठी शेतकरी आपला माल बाजारपेठेत आणून विकताना दिसत आहे.

पण अजून पर्यंत माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याच्या काट्याची पडताळणी झाली नसल्याने वजन काट्याच्या मापात पाप होत असल्याची चर्चा शेतकऱ्यासह बाजारात येणाऱ्या ग्राहकांकडून केल्या जात आहे.वेळप्रसंगी एका एका झाडाला निंदन खुरपण करून आपले पीक पिकविणाऱ्या शेतकऱ्यावर ही वेळ यावी हे दुर्दैवच.

यामुळे ढाणकी शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी अभिमन्यू तर ठरत नाही ना?? हे बघायला मात्र कोणताही राजकारणी पुढे सरसावून बोलायला तयार नाही तसेच शासकीय यंत्रणा या ठिकाणी निकामी झाली का?? असा प्रश्न पडतो आहे वैध मापनशास्त्र यंत्रणा शहरात फिरकत नसल्यामुळे अनेकांचे चांगभलं होत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच काही दिवसांनी कापूस बाजारपेठेत येईल.

यास पांढरे सोने म्हणून ओळखले जाते त्या खरेदीला सुरुवात होऊन मोठ मोठ्या दुकानात नागरिक माल विक्री करत असताना दुकानातील किंवा व्यापाऱ्याचे माल घेण्याची किंवा विकण्याचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे तपासणी करणे अगत्याचे असून अनेक सर्वसामान्य शेतकऱ्याची व ग्राहकाची या वजन काट्या द्वारा लुबाडणूक होत असल्याची चर्चा ढाणकी शहरासह गावखेड्यात ऐकिवात आहे त्यामुळे या शहरी व ग्रामीण भागातील वजन काट्याच्या मापात पाप वाढत असल्याचे चित्र असल्यामुळे काही अंशी वजन काट्याची तपासणी करावी अशी मागणी आता शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकाकडून होत आहे.

तसेच सर्वसामान्य शेतकरी याच वजन काट्याच्या मापावर विश्वास ठेवून माल विकतात व खरेदी पण करत असतात असे असताना वजन काट्याच्या या जादूच्या प्रयोगामुळे अनेकांच्या डोळ्यावर पडदा आल्याचे चित्र आहे.

झटपट श्रीमंत होण्याच्या मागे अनेक जण धावत असल्याने हा लुटीचा व्यवसाय उदयास येतो आहे. येणाऱ्या काळात यावर संबंधित यंत्रणेने वेळेवर नियंत्रण न मिळवल्यास ही यंत्रणा ग्राहकाची तसेच सर्वसामान्य शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लूट माजवेल असं बोलल्या जात आहे.