प्रामाणिक भिम सैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक असते!

128

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० ला पाक्षिक मूकनायक सुरु केले होते त्याचा १०४ वा वर्धापनदिन ३१ जानेवारी २०२४ ला आहे त्यानिमित्ताने हा विशेष लेख देत आहे वाचकांनी तो वाचून निर्भीड,निपक्ष प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात ही सुरवातलाच अपेक्षा करतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रे व पाक्षिकांचे प्रकाशन आणि संपादन केले. त्यांना या वृत्तपत्र-पाक्षिकांनी बहुजन चळवळीला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. खरे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरच बहुजन पत्रकारितेचे आधार स्तंभ आहेत. ते बहुजन समाजाचे पाक्षिकाचे प्रथम संपादक,संस्थापक व प्रकाशक आहेत, त्यांच्या द्वारा संपादित वृत्तपत्र आजच्या पत्रकारितेसाठी एक मानदंड असायला पाहिजेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा निघालेले वृत्तपत्र-पाक्षिकांची नावे वेळोवेळी बदललेल्या परिस्थितीनुसार नांव दिली आहेत. पाक्षिक मूकनायक म्हणजे न बोलणाऱ्यांना बोलण्याची संधी व नेतृत्वाची सुवर्ण संधी,बोलणारे लिहणारे आणि लढणारे झाले तेव्हा त्यांनी नांव दिले जनता,त्याचा बहुजन समाजात समानता असावी म्हणून नांव दिले समता,जेव्हा हाच बहुजन समाज बहिष्कृत होता तेव्हा त्यांनी नांव दिले बहिष्कृत भारत.आणि बहिष्कृत भारतातून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा प्रबुद्ध भारत.

प्रबुद्ध भारत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले शेवटचे वृत्तपत्र होते. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा पाच कोटी लोक होते असे म्हणतात.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नंतर हे पाक्षिक बंद पडले.बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे समाजात प्रचंड बदल झाला असावा.कारण महार समाजाचे लोक भिमसैनिक झाले असावे.लाखो करोडो भिमसैनिक असल्यामुळे पाक्षिक प्रबुद्ध भारत दैनिक प्रबुद्ध भारत झाले पाहिजे होते.बाळासाहेब ठाकरेचे (बाळ सैनिक) शिवसैनिक आहेत म्हणून सामना दैनिक आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भिमसैनिक असते तर प्रबुद्ध भारत दैनिक आज असते.

११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.तो आज पर्यंत त्यांच्या पक्ष संघटनेचे मुखपत्र झाला आहे.भारिप बहुजन महासंघ ते वंचित भक्तांच्या पलीकडे तो भिमसैनिकाचा पाक्षिक (दैनिक) होऊ शकला नाही.आजच्या घडीला वंचित बहुजन आघाडी पक्ष राज्यात लक्षवेधी आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे. खऱ्या अर्थाने तोच बहुजनाचे नेतृत्व करीत आहे.

जिल्हा परिषद,पंचायत समिति,विधानसभा,लोकसभा सर्वच मतदार संघात त्यांची मतदान संख्या दखल पात्र आहे. कार्यकर्त्यांचे खेड्या पड्यात शहरी भागात कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आहे. त्यात सुशिक्षित कमी आणि अशिक्षित मोठ्या संख्याने भक्त अनुयायी सैनिक खूप आहेत. कामगार कर्मचारी अधिकारी संघटित कमी असले तरी असंघटित कामगारांची संख्या लक्षवेधी आहे. या एकूण सर्व संख्याच्या बळावर प्रबुद्ध भारत दैनिक असायला पाहिजे होते.पण ते का नाही यांचे गांभीर्याने आत्मचिंतन परीक्षण होणे आवश्यक आहे. इतरावर टीका टिपणी करण्या अगोदर या भिम सैनिकानी प्रबुद्ध भारत दैनिकाबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.एका वैचारिक पक्षाचे मुखपत्र आर्थिक दुष्टिने सामाजिक बांधिलकी ठेऊन पत्रकारिता करणाऱ्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झाले तर त्याला एका उद्योग धंद्याचे व्यवसायीक स्वरूप देता आले पाहिजे. शॉट कट मारून ते अशक्य आहे. योजनाबद्ध नियोजन बद्ध काम केल्यास भिमसैनिकांचे प्रबुद्ध भारत दैनिक होऊ शकते. त्यासाठी संविधानिक मूल्य मान्य असली पाहिजेत.नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.तरच ते यशस्वी वाटचाल करू शकते.

आंबेडकरी चळवळीत बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो.पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन त्यावर वैचारिक लढा उभारून सडेतोड उतर देणारे एकही दैनिक नाही.रोखठोक,निर्भीडपणे,निपक्षपाती लिहणे अपेक्षित असते.चुकीचे वागणाऱ्या नेत्यांना त्यांची भूमिका कशी वैचारिक पातळीवर चुकीची आहे.हे सांगण्याचे काम वैचारिक पातळीवर संपादक बुद्धीजीवी विचारवंतानी केलेच पाहिजे.ते होत नसल्यामुळेच आंबेडकरी चळवळीत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जास्त जन्मा येत आहेत.त्याकारणाने गल्ली बोळात स्वयंघोषित नेते झाल्यामुळेच चळवळ व समाज दिशाहीन झाला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते.” हे वाक्य वापरून ज्यांनी ज्यांनी पत्रकारिता केली, त्यांचे क्रांतिकारी विचारांची चळवळ उभी करणे हे उदिष्ट कधीच नव्हते.त्यांनी शब्दात शहाणपण,विचारात निष्ठा, वर्तनात चारित्र्य या ब्रिदवाक्यनुसार चळवळीतील कार्यकर्ते,नेते याची दररोज चे जगण्याची साधन आणि पद्धत जवळून तपासली पाहिजेत.समाजातील असे कार्यकर्ते नेते कोणती चळवळ चालविणार आणि मग त्यांना कोणत्या चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता लागेल.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सांगून फक्त वैचारिक लेख प्रसिद्ध करीत राहिलो.तर क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी कोणी करावी?. कधी करावी?. कशी करावी?. हेच ठरत नसल्यामुळे आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होती त्यापेक्षा दिशाहीन झाली आहे. म्हणूनच शिस्तबद्ध भिमसैनिकांचा दैनिक प्रबुद्ध भारत हवा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक १०४ व्या वर्धापनदिना निमित्य हार्दिक शुभेच्छा देताना अपेक्षा लाखो वाचक करतात.

आंबेडकरी विचारधारा मानणारे चळवळीतील राज्यात आज अनेक वृतपत्रे आहेत. जे आर्थिक संकटावर मात्र करून जिल्हा पातळीवर पंधरा अठरा वर्षापासून नियमितपणे दैनिक प्रकाशन करीत असतात. त्यात आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी नियमितपणे लिहतो. त्यामुळे मी ज्या असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारी सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन चे काम करतो.असंघटित कामगार लोक कसे जगतात,त्यांना रोजीरोटीसाठी काय काय करावे लागते. याचा कोणीच विचार करीत नाही.तरी हाच झोपडपट्टीत राहणारा असंघटीत कष्टकरी समाज आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,नेत्या सोबत अन्याय अत्याचार आणि पुतळा विटंबना झाल्या नंतर कोणत्याही आंदोलनात सर्वात पुढे असतो.तोच खरी चळवळ पुढे आणि मागे नेतो.त्याला शिस्तबद्ध भिमसैनिक म्हणून उभे केल्यास अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील आणि भिमसैनिकांचे प्रबुद्ध भारत दैनिक चळवळीला योग्य दिशा दाखवून योग्य दिशेला घेऊन जाणार त्यासाठी इच्छाशक्ती हवी,तीच बुद्धीजीवी विचारवंतानी दाखविली पाहिजे. असे मला वाटते.

लाखो करोडो भिमसैनिक अनुयायी,भक्त, शिष्य आहेत.पण शिस्त नसेल तर काय कामाचे?.क्रांतिकारी आंबेडकरी विचार मान्य असणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा,चर्चा, संवाद,मैत्रीभावना जागृत करावी आणि सकारत्मक विचारांची उर्जा असेल तर संपर्क करावा. जागरूक वाचकांना पाक्षिक मूकनायक १०४ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप-मुंबई,अध्यक्ष – सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९९२०४०३८५९