मराठी व हिंदी भाषेचे कविवर्य!

35

(महादजी शिंदे पुण्यतिथी विशेष)

महादजी शिंदे यांचा मूळ पिंड लढवय्या वीराचा असला, तरी ते राजकारणातही वाकबगार होते. युद्धप्रसंगी केव्हा लढावे? केव्हा माघार घ्यावी? याचे उत्तम ज्ञान त्यास होते. आपले लष्कर त्यांनी फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मदतीने सुसज्ज केले आणि शस्त्रास्त्रे तयार करून घेतली. दिल्लीवर कब्जा, राजस्थानात वर्चस्व व उत्तर हिदुस्थानात दरारा ही त्याची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची आहे. त्यांच्या पावन स्मृती जागविण्यास श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा हा लेख अवश्य वाचा…

महादजींना अपत्य नव्हते. अखेर त्यांनी आपल्या जहागिरीच्या व्यवस्थेसाठी आपल्या भावाचा नातू दौलतराव याची निवड केली होती. त्यांचा मूळ पिंड लढवय्या वीराचा असला, तरी ते राजकारणातही वाकबगार होते. युद्धप्रसंगी केव्हा लढावे? केव्हा माघार घ्यावी? याचे उत्तम ज्ञान त्यास होते. आपले लष्कर त्यांनी फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मदतीने सुसज्ज केले आणि शस्त्रास्त्रे तयार करून घेतली. दिल्लीवर कब्जा, राजस्थानात वर्चस्व व उत्तर हिदुस्थानात दरारा ही त्याची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची आहे. महादजींना हिंदू तथा मुस्लीम साधुसंतांविषयी आदर होता. बीडच्या मन्सूरशाह वली या मुस्लीम साधूवर त्यांची विशेष भक्ती होती. याशिवाय सोहिरोबानाथ आंबिये, लक्ष्मण महाराज रामदासी, शिरगावकर, मल्लप्पा, रासकर, दत्तनाथ राक्षसभुवनकर आदी साधुसंतांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांना हिंदी, उर्दू, संस्कृत, फारसी या भाषा अवगत होत्या. महादजी मराठी व हिंदी भाषांत कविता करीत असत. त्यांची कृष्णभक्तीवरील कवने उपलब्ध आहेत. ते कीर्तन करताना ती म्हणत असत. त्यांनी गीतेवर टीका लिहिली होती. परंतु ती उपलब्ध नाही. त्यांच्या आश्रयास सुखदेव वैद्य, बालमुकुंद मिश्र, सविता, सुरती मिश्र यांसारखे वैद्य, कवी तसेच गवई, तमासगीर, चित्रकार व पखवाजी होते. महादजींनी उज्जैन, गोकुळ, वृंदावन, पुष्कर आदी ठिकाणी बांधकामे केली.

राहत्या जांबगावास माधवनगर हे नाव देऊन तेथे महाल बांधला. महादजी कडक शिस्तीचे आणि अत्यंत स्वाभिमानी होते. गुलाम कादर, कारस्थानी इस्माईल बेग यांस त्यांनी फाशीची शिक्षा दिली, तर ज्याने होळकरांविरुद्ध कारस्थान केले तो गोपाळराव व आनंदराव नरसिंग यांना त्यांच्या अपराधाबद्दल शिक्षा ठोठावल्या.

महादजी शिंदे म्हणजे उत्तर पेशवाईतील एक पराक्रमी सेनानी आणि मराठा साम्राज्याचे मुत्सद्दी होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा विश्वासू सरदार राणोजी यास चिमाबाई या राजपूत स्त्रीपासून झालेला हा मुलगा होय. महादजींचा जन्म दि.३ डिसेंबर १७३० रोजी पुणे येथे झाला. शिंद्यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कण्हेरेखेड ता. कोरेगाव या गावचे होते. राणोजी व जयाप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजींना शिपाईगिरीचे शिक्षण मिळाले. त्यांनी प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम करून नाव मिळविले. त्यांनी औरंगाबाद येथे सन १७५१, साखरखेडले येथे सन १७५६, पंजाब येथे सन १७५९ इत्यादी सालच्या मोहिमांतही त्यांनी भाग घेतला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत एका पठाणाने केलेल्या आघातामुळे ते लंगडे झाले. तेव्हा राणेखान नावाच्या एका मुसलमान भिस्त्याने त्यांना मदत केली. महादजींनी त्यास भाऊ मानून पुढे सरदार केले. थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत राघोबाच्या नादी लागून पटवर्धन प्रतिनिधी यांच्याप्रमाणेच निजामाला जाऊन मिळण्याच्या बेतात ते होते.

गोहदच्या जाटांविरुद्ध राघोबाच्या नेतृत्वाखाली ते लढले. थोरल्या माधवरावांनी त्यांना सन १७६८मध्ये सरदारकी दिली. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांची दौलत खालसा करावी, म्हणून राघोबा प्रयत्नशील होता. तेव्हा महादजींनी अहिल्याबाईस मातोश्री मानून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे ठरविले. पेशव्यांनी त्यांना पानिपतचे अपयश धुऊन काढण्यासाठी बिनीवाले व कानडे यांबरोबर दिल्लीकडे रवाना केले. तेथे महादजींनी नजीबखानाचा रोहिलखंड प्रांत लुटून ताब्यात घेतला आणि शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवून दिल्लीच्या तख्तावर बसविले. त्यामुळे पेशव्यांस उत्तरेत मराठ्यांचा जम बसविण्यास महादजींचे मोठे साहाय्य झाले. राजस्थानात उदयपूरच्या तंट्यात त्यांनी साठ लाख खंडणीसह प्रांत मिळविला आणि आपला सुभेदार तेथे नेमला.

नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर बाराभाईचे कारस्थान उद्भवले. कोणत्या पक्षास मिळावे? याविषयी महादजींचा निश्चय प्रथम झाला नाही, परंतु नाना फडणीस व सखारामबापू यांनी त्यास मुलूख वगैरे देऊन आपल्या पक्षाकडे घेतले आणि राघोबाचा बंदोबस्त केला. तोतयाचे बंड महादजींनी मोडले. कोल्हापूरच्या छ्त्रपतींनी पेशव्यांचा मुलूख घेऊन कारस्थाने आरंभिली, तेव्हा महादजींनी त्यांना धडा शिकविला आणि यापुढे राघोबा व हैदर यांच्याशी संबंध ठेवणार नाही, असा करार करून घेतला. नाना फडणीसांचा चुलत भाऊ मोरोबा फडणीस याने राघोबा, इंग्रज व तुकोजी होळकर यांच्या मदतीने बंड केले आणि तीन महिने पुण्याचा कारभार हाती घेतला. तेव्हा महादजींनी मुत्सद्दीगिरीने होळकर व सखारामबापू यांना त्यातून फोडले. त्यांनी इंग्रजांना चुचकारून बंड मोडून काढले. इंग्रजांच्या कवायती सेनेची शिस्त पाहून त्याने डि.बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले व शिस्तबद्ध फौज तयार केली. त्यांच्या पदरी तीस हजार कवायती पायदळ, पाचशे तोफा व तीस हजार घोडदळ एवढे सुसज्ज सैन्य होते. ते मुख्यत्वे ग्वाल्हेर आणि राजधानी उज्जैन येथे होती. त्यात मराठ्यांपेक्षा मुसलमान, राजपूत व युरोपीय यांचा भरणा जास्त होता. त्याने तोफा ओतण्याचा कारखाना आग्र्यात काढून हत्यारे तयार करण्यास उत्तेजन दिले. दिल्लीच्या बादशाहीवरील मराठ्यांचे वर्चस्व कमी झाले असताना या कवायती फौजेच्या जोरावर ते पुन्हा प्रस्थापित केले.

त्यासाठी दिल्लीतील मुसलमान सरदारांच्या सन १७८४मधील भांडणाचा फायदा घेऊन बादशहास ताब्यात घेतले. बादशहाकडून वकील-इ-मुतालिक- मुख्य कारभारी ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५ हजारी नेमणुका करून सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. शिवाय बादशहाकडून गोवध बंदीचे फर्मान काढविले. महादजी मथुरेस राहू लागले. त्यांच्या वाढत्या सत्तेस शह देण्यासाठी मुसलमान सरदार व काही राजपूत राजे यांनी त्याविरुद्ध बंडाळी माजविली. लालसोटच्या लढाईत बादशहाची सर्व फौज राजपुतांना मिळाली. त्यावेळी महादजींना माघार घ्यावी लागली. इस्माईल बेग, गुलाम कादर वगैरेंनी दिल्ली, अलीगढ वगैरे ठाणी काबीज करून महादजींना चंबळ नदीच्या पलीकडे रेटले. या सुमारास गुलाम कादरने शाह आलमचे डोळे काढून त्याच्या जनानखान्याची बेअब्रू केली. त्यावेळी महादजींनी ताठर भूमिका सोडून पुणे दरबारची म्हणजे नाना फडणीसांची मदत मागितली. सन १७८८साली नानांनी अली बहादरास त्यांच्या मदतीला पाठविले. त्यांनी शीख-जाट यांना मदतीस घेऊन गुलाम कादर व त्याचे सहकारी मुस्लीम सरदार आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर आदी राजपूत राजे यांचा पराभव केला दिल्ली पुन्हा हस्तगत केली. राजस्थानवर आपले वर्चस्व स्थापित केले. हतबल शाह आलम यास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि गुलाम कादरखान व बेग यांस देहान्त शासन केले. त्यानंतर पातशाही कारभार महादजींनी आपल्या हाती घेतला. अशाप्रकारे त्यांनी आपल्या पराक्रमाने व कर्तृत्वाने सतलजपासून तुंगभद्रापर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या. असा उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला.

उत्तर हिदुस्थानात सुमारे बारा वर्षे राहून तेथे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर महादजी जून १७९२ मध्ये पुण्यास आले. सवाई माधवरावांनी त्यांचा यथोचित मानसन्मान केला. सुमारे पावणेदोन वर्षे ते पुण्यात स्वस्थच होते. अखेर एकाएकी नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथे दि.१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांची स्मृतिछत्री वानवडीस उभारली आहे.

!! त्यांच्या अचाट कार्यकर्तृत्वाला स्मृतिदिनी मानाचा मुजरा !!


✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.मु. पो. ता. जि. गडचिरोलीफक्त व्हॉट्सॲप- 9423714883
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com