दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यानी परीक्षेला जाताना लक्षात ठेवावयाच्या सूचना

452

सर्वप्रथम इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

अभ्यास करावा।
निद्रेला सोडून ॥
प्रभाती उठून।
विद्यार्थ्यांनी ॥

मी वरील अभंगात सांगितल्या प्रमाणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर आदर्श अभ्यास केलेला असेल हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.आता या वर्षभर केलेल्या अभ्यासाची मांडणी बोर्डने दिलेल्या वेळेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे करायची आहे .परीक्षेला जाताना लक्षात ठेवावयच्या सूचना अगदी लहान असतात पण त्या गुणवृद्धीसाठी अतिशय महान असतात याविषयीचेच हितगुज आपण येथे करणार आहोत.

पाच मिनिट वेळ काढून हा लेख वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी द्यावा व तसे आचरण करावे. विद्यार्थ्यांना शक्य न झाल्यास त्यांच्या पालकांनी हा लेख वाचून पाल्यांना या सूचना सांगाव्या.या सूचना आचरणात आणल्यास विद्यार्थ्यांना गुणवृद्धीसाठी निश्चितच फायदा होईल यात शंका नाही.

विद्यार्थी जीवन ।
करा त्यागमय ॥
होई अभ्युदय ।
जीवनाचा ॥

विद्यार्थी जीवनाचा विकास करण्यासाठी तुम्ही वर्षभर अभ्यास पूरक नसलेल्या आणि गुणवृद्धीसाठी आवश्यक नसलेल्या गोष्टींचा पूर्ण त्याग केलेला आहे त्यामुळे तुमचा प्रत्येक विषयाचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे.आता हा वर्षभर केलेला प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची बोर्डाने दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला उत्तर पत्रिकेत सुंदर मांडणी करायची आहे तीच येथे आपण बघणार आहोत.
पेपर सोडविताना खाली दिलेल्या सर्व सूचनांचे आचरण केल्यास त्याचा गुणवृद्धिसाठी फायदाच होईल .

परीक्षेच्या दिवशी मनशांती आवश्यक :-मानवी मन हे चंचल आहे.मन क्षणार्धात कोठेही जाते म्हणून अभ्यास करतानाच नव्हे तर परीक्षेच्या दिवशी सुद्धा मनाची शांतता – एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे.ज्या दिवशी जो पेपर असेल तो पेपर अर्थात विषय त्या विषयाचा अभ्यास,त्या विषयाचे पाठ आणि मी या व्यतिरिक्त काहीच नाही हा एकच मनी भाव असणे अत्यंत आवश्यक आहे.असे केल्यास परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडवताना प्रश्नांची उत्तरे भरभर आठवतील व चांगल्या प्रकारे विद्यार्थी पेपर सोडवू शकेल त्यामुळे गुणवृद्धी होईल,म्हणून परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पेपरच्या दिवशी मनाची शांतता ठेवणे आवश्यक आहे.

पेपरच्या पूर्वीचा आहार : -पेपरच्या दोन तास अगोदर हलकासा आहार घ्यावा. पूर्ण जेवण करून पेपरला जाऊ नये असे केल्यास परीक्षा हॉलमध्ये डुलकीची शक्यता नाकारता येत नाही कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो,हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

पेपरच्या पूर्व रात्रीची झोप : -पेपरच्या पूर्वीच्या रात्री चार ते पाच तास झोप घेणे आवश्यक आहे कारण अधिकच्या जागरणाने उत्तरपत्रिका लिहिताना पेंगण्याचा त्रास होऊ शकतो.असा विद्यार्थी उत्तम प्रकारे उत्तरे लिहू शकत नाही .
स्वतःची पाण्याची बॉटल आवश्यक :-परीक्षा हॉलमध्ये मिळालेल्या ग्लासमधील पाणी पूर्ण प्यावे,अर्धवट पाणी पिऊन डेक्सवर ग्लास ठेवला तर धक्का लागून तो पडल्यास तुमची उत्तरपत्रिका पाण्यात भिजू शकते म्हणून स्वत: पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा हवे तेव्हा पाणी प्या व सुरक्षित राहा.

परीक्षेला जाताना आवश्यक वस्तू :परीक्षेच्या चार तास अगोदर पेपरसाठी आवश्यक असलेल्या कंपासपेटी मधील सामान व्यवस्थित करून ठेवा. उदाहरणार्थ पेन ,पेन्सिल, खोडरबर, लहान व मोठी स्केल इत्यादी तसेच प्रवेशपत्र व पाण्याची बाँटल इत्यादी.एखादा विद्यार्थी प्रवेशपत्र घरी विसरून जातो त्यामुळे तो विद्यार्थी खूपच घाबरून जातो.काय करावे कळत नाही अशी अवस्था झाली तर केलेला त्या विषयाचा अभ्यासही विसरण्याची शक्यताअसते,म्हणून परीक्षेच्या चार तास अगोदरच परीक्षेसाठी आवश्यक वस्तू एकत्रित करून त्या परीक्षेला जाताना सोबत घेऊन जाणे आवश्यक असते.

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरचे कार्य : -परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर कोणत्याही गोष्टीवर जास्त चर्चा करु नका.जास्त बोलू नका. बोर्डावरील सिटिंग प्लॅान बघून आपला नंबर कोणत्या रुममध्ये आहे ते बघा.लघुशंका आटोपूनच परीक्षा हॉलमध्ये जाणे कारण परीक्षा सुरू झाल्यानंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. हे सर्व
विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे

परीक्षा हॉलमधील प्रथम कार्य : -परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर स्वत:च्या नंबरचा डेक्स – बेंच व्यवस्थित आहे की नाही ते बघणे.तो जास्त हलतो का ? ते बघणे.लिहिण्यासारखा नसेलच तर बदलवून मागणे.सर्वप्रथम बेंचच्या पायाखाली काही कागद वगैरे आहे का ते बघणे.डेक्स-बेंचच्या आतील सर्व बाजू चाचपून पाहणे जर काही कागद आढळले तर ते पर्यवेक्षकांजवळ देणे आणि लिहिताना आपल्या डेक्स-बेंचखाली कोणी काही फेकून दिलेले कागद असल्यास ते पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून देणे.पेपर सोडवित असताना परीक्षा हॉलमध्ये काही गडबड सुरू असल्यास तिकडे आपण लक्ष न देता फक्त उत्तरपत्रिका सोडवणे कारण परीक्षा हॉलमधील एक सेकंद एक गुण मिळवून देऊ शकतो हे लक्षात ठेवणे.पेपर सोडविताना लक्ष विचलित होऊ देऊ नये.

उत्तरपत्रिका मिळाल्यानंतरचे कार्य : -उत्तरपत्रिका मिळाल्यावर तिचे पूर्ण पृष्ठ व्यवस्थित आहे का? नंबरप्रमाणे पूर्ण पृष्ठ आहेत का? एखादे पृष्ठ फाटलेले आहे का? एखादे पृष्ठ कोरे आहे का? पूर्ण रेषा आहेत की अर्धवट आहेत.पहिल्या पृष्ठावरील प्रिंट व्यवस्थित आहे का? जर फॉल्टी उत्तरपत्रिका आढळली तर लगेच ती पर्यवेक्षकांजवळ देणे व दुसरी घेणे,दुसरी घेतल्यावरही ती तशीच तपासून घेणे.उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेतील उत्तरपत्रिकेच्या दुसऱ्या पृष्ठावरील सूचना काळजीपूर्वक वाचणे आणि त्या पेपर सोडविताना आचरणात आणणे आवश्यक आहे.उत्तरपत्रिकेत ओळखीच्या खाणाखुणा, पत्ता,फोन नंबर इत्यादी लिहू नये.” जा जा रे पेपर मास्तर के पास । आयेंगी दया तो कर देंगे पास ॥” असे काहीही लिहू नये कारण तुम्ही अभ्यास केला नसेल आणि काहीच लिहिले नसेल तर तपासणीस दया कशी दाखवेल. उत्तरपत्रिका उत्तम आहे असे समजल्यावर सर्वप्रथम आपल्या प्रवेशपत्रावरून रोल नंबर अक्षरात व आकड्यात बिनचूक लिहिणे,स्वत:ची सही करणे,केंद्र क्रमांक,दिनांक,विषय,माध्यम, पेपर क्रमांक इत्यादी बिनचूक लिहिणे.हे सर्व लिहिल्यावरही
एक भाग लिहायचा राहतो तो म्हणजे पुरवण्यांचा या भागात पूर्ण उत्तरपत्रिका सोडून झाल्यावर जर मुख्य उत्तरपत्रिका सोडून दोन पुरवण्या घेतल्या असतील तर मुख्य उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरील “नंबर ऑफ सप्लिमेंट” या रकाण्यात दोन असे लिहून टोटलच्या रकाण्यात तीन हा आकडा लिहिणे कारण मुख्य उत्तरपत्रिकेचा एक आकडा पहिल्या रकाण्यात लिहिलेला असतोच.पर्यवेक्षकांनी दिलेला बारकोड स्टिकर पर्यवेक्षकांनी सांगितलेल्या सूचनेनुसार व्यवस्थित चिकटविणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेत प्रत्येक पानावर समास आखणे : -रोल नंबर व इतर माहिती लिहिल्यावर उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला बोर्डाने आखलेल्या समासाच्या आत एक सेंटीमीटरच्या अंतराने प्रत्येक पृष्ठावर उपप्रश्न नंबर लिहिण्यासाठी समास आखावा. पृष्ठाच्या उजव्या बाजूला समास आखू नये.

प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतरचे कार्य : -प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती पूर्ण प्रश्नांची आहे का ? ते बघणे नंतरच ; ती प्रश्नपत्रिका पूर्ण प्रश्नांची नसेल तर ते पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून देणे व दुसऱ्या प्रश्नपत्रिकेची मागणी करणे नंतर वाचणे.

प्रश्नांची उत्तरे सोडविताना : -पहिल्या प्रश्नातील जो उपप्रश्न उत्तम येत असेल तेथून उत्तर सोडविण्यास सुरूवात ; कारण पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातील सुटसुटीतपणा, नीटनेटकेपणा, वळणदार हस्ताक्षर हे सर्व बघून परीक्षकाच्या मनात ही उत्तरपत्रिका गुणवंत विद्यार्थ्यांची आहे हे लक्षात येते,नव्हे अशा प्रकारच्या उत्तरपत्रिके विषयीची चांगली दृष्टी परीक्षकाच्या मनात निर्माण होते. अशा उत्कृष्ठ उत्तरपत्रिके विषयी सकारात्मक दृष्टिकोन परीक्षकाचा होतो;म्हणून विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाची अशी उत्कृष्ट उत्तरपत्रिका सोडवली पाहिजे.

अतिरिक्त उत्तरे न सोडविणे : -प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न जेवढे विचारले तेवढेच सोडविणे व ते एकापाठोपाठ एक सोडविणे,अतिरिक्त उत्तरे सोडवून लाख मोलाचा वेळ व्यर्थ घालवू नये.

उत्तरे सोडवताना वेळेचे नियोजन आवश्यक : -पेपर सोडविताना १०० गुणांच्या पेपरसाठी एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे गुण विभागणी केल्यास शंभर गुणाला ९९०० सेकंद लागतात म्हणजेच १६५ मिनिट,उरलेल्या पंधरा मिनिटात शेवटी स्वत:ची उत्तरपत्रिका स्वत: तपासावी अर्थात शीर्षक,मुद्दे व परिच्छेदातील महत्त्वाचा एक शब्द अधोरेखित करणे,अवतरण चिन्ह दिले नसल्यास देणे,उत्तर संपल्यानंतर रेषा आखणे.
रिकाम्या जागेत डावीकडून उजवीकडे आडवी रेषा देऊन पी.टी.ओ.लिहिणे,शेवटच्या पंधरा मिनिटांचा उपयोग असा करावा.

दीर्घची दीर्घ व लघुची लघु उत्तरे सोडवा :-दीर्घ प्रश्नांची उत्तरे दीर्घ व लघु प्रश्नांची उत्तरे लघु लिहावी. येत असेल तरीही अतिरिक्त उत्तर लिहून व्यर्थ वेळ घालवू नये.उत्तम
गुणांसाठी पूर्ण गुणांचा पेपर व पूर्ण गुणांचे उत्तर सोडविणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
उत्तरपत्रिकेत वळणदार

हस्ताक्षरांचे महत्त्व : -नियमानुसार ।
इकार उकार ॥
अक्षर आकार ।
आकर्षक ॥

उत्तरे लिहिताना अक्षर खूप लहान अथवा मोठे नको. वळणदार व एकसारखे असावे.लिहिताना वळणदार हस्ताक्षरांचे काही नियम आचरणात आणल्यास अक्षर वळणदार येतील उदा.अक्षरांची जाडी व उंची समान असावी, अक्षरे शिरोरेषेला चिकटलेली असावी,अक्षरांची वेलांटी,उकार व मात्रा अक्षराच्या निम्मे असावी, दोन शब्दांमधील अंतर करंगळीएवढे असावे,अक्षरांची वेलांटी व मात्रा अक्षराच्या आकाराला चिकटलेली असावी, अक्षराला विशिष्ट वळण असावे इत्यादी .

उत्तर लिहिताना शीर्षकाने प्रारंभ आवश्यक : -कोणत्याही विषयाच्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना प्रथम प्रश्नांमधूनच शीर्षक तयार करावे व ते उत्तर लिहिताना प्रारंभी मधोमध लिहून अधोरेखित करावे व त्याला दुहेरी अवतरण चिन्ह द्यावे.दीर्घ अथवा निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे सोडविताना प्रस्तावनेतील व प्रत्येक परिच्छेदातील एक महत्त्वाचा शब्द अधोरेखित करावा.

पुरवणी घेतली तर … : -पुरवणी घेतली असल्यास ती पक्की बांधावी.ती पक्की न बांधल्यास तपासताना सुटण्याची आणि गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही .पुरवणी मिळाल्याबरोबर तिच्यावर प्रथम रोल नंबर व इतर माहिती लिहावी आणि होलोक्राँफ्ट स्टिकर चिकटवावे.उत्तरपत्रिकेचे शेवटचे पृष्ठ लिहिण्याचा प्रारंभ करतानाच पर्यवेक्षकांना पुरवणी मागावी कारण मुख्य उत्तरपत्रिका पूर्ण सोडवल्यानंतर जर मागितली व पुरवणी मिळायला उशीर झाला तर व्यर्थ वेळ जाऊ शकतो . शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मुख्य उत्तरपत्रिकेवर होलोक्राँफ्ट स्टिकर चिकटवावे.

कॉपीमुक्त परीक्षा देणे आवश्यक :
कॉपीमुक्त अभियान आले ।
खूप चांगले झाले॥
वर्गातील मुलं-मुली ।
अभ्यासाला लागले ॥
विद्यार्थ्यांचा असा पक्का विचार असावा की कॉपी करून पास होण्यापेक्षा मी नापास होणे पसंत करेल कारण कॉपी करणारा पुढे उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही म्हणून कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेऊनच विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करावा.वरील सर्व सूचनांचे आचरण करण्यात तसेच पूर्ण पेपर उत्तम सोडविण्यात व पूर्ण पेपरमधील पूर्ण प्रश्नांची उत्तरे उत्तम सोडवण्यातच प्रावीण्याचे गुपित दडलेले आहे;म्हणून वरील आवश्यक सूचनांचे विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना – पेपर सोडवताना आचरण करून परीक्षेत भरपूर यश संपादन करावे आणि गुणवंत – यशवंत होऊन आई – वडील आणि गुरुजनांना आनंदित करावे.

परीक्षेला माझ्या ।
हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा ।
विद्यार्थ्यांना ॥

✒️डॉ.हरिवंशराय बच्चन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त(प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणीनगर,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९