जिल्ह्यात दारुबंदी कायम ठेवण्यासाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.6जानेवारी):-जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी काही राजकीय पुढारी हालचाली करीत आहेत.
परंतु दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता जिल्ह्यात दारूबंदी अधिक कडकपणे राबविण्यासाठी चंद्रपूर शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्याची महत्त्वाची बैठक पार पडली.यात विविध संघटना व समित्यांच्या पदाधिकार्यांनी सहभाग घेतला होता.

सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.बैठकीला नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोटटुवार, सेवा मंडळाचे प्रचारक विजय चिताडे, धर्माजी खंगार,आण्याजी ढवस, डॉ. दयाराम नन्नावरे, अशोक संगीडवार, बबनराव मत्ते, बबनराव अलमुलवार, देवराव बोबडे, भाष्कर इसनकर, वासुदेव घोडे, रामराव धारणे, बाबुराव ढवळे, मंजुश्री कासनगोट्टूवार,प्रज्ञाताई बोरगमवार, वृषाली धर्मपुरीवार, संगीता खंगार, रेखा काकडे, नंदा पिंपळकर आदी विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत व्हावी यासाठी काय कृती करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.दारुमुक्त गाव निर्माण करण्यासाठी गावागावात शहरातील वार्डावार्डात महिला गट निर्माण करावे लागेल , असे सुभाष कासनगोट्टूवार म्हणाले. डा. दयाराम नन्नावरे यांनी दारू बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करणा-या प्रवृत्तीचा निषेध केला.जे लोक सावित्रीबाईच्या लेकीचा सत्कार करित आहे तेच लोक दारू चालू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे , हे एक आश्चर्य आहे असे , ज्येष्ठ प्रचारक विजय चिताडे म्हणाले. जेष्ठ नागरिक संघाचे अशोक संगीडवार म्हणाले , दारूबंदी उठवली तर जिल्हा विकासाच्या बजेट पेक्षा जास्त खर्च होईल.

या वेळी विविध महिला संघटना,जेष्ट नागरिक संघ, गुरुदेव सेवा मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभाष कासनगोटटुवार लाभले होते. राष्ट्रवंदना, जयघोष घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला. सूत्रसंचालन विजय चिताडे तर आभार डॉ . दयाराम नन्नावरे यांनी मानले.