✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)
गेवराई(दि.13नोव्हेंबर):-देशभरातून क्षयरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून या कार्यक्रमातंर्गत घरोघरी जावून क्षय रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे.जिल्हाभरात सद्यस्थितीत 1460 क्षयरोगाचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी दिली. बीड जिल्ह्यामध्ये घराघरात जावून क्षयरुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
ही मोहीम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प.चे सीईओ अजित पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी राऊफ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेली आहे.15 ते 25 नोव्हेंबर व 13 ते 23 डिसेंबर या दरम्यान शोध मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी आशा स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी क्षयरुग्ण आढळतील त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून उपचार केले जाणार आहेत. सद्यस्थितीत जिल्हाभरात 1460 क्षयरुग्ण आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये डॉ. जयवंत मोरे यांनी दिली आहे.