उपविभागात संभाव्य 177 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत

31

🔸महाराष्ट्र भुजल अधिनियम या गावांमध्ये लागू

🔹 बुलडाणा तालुक्यातील 65 व चिखलीमधील 112 गावांचा समावेश

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.6जानेवारी):-बुलडाणा उपविभागातील बुलडाणा व चिखली तालुक्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य 177 गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषीत केली आहे. यामध्ये बुलडाणा तालुक्यातील 65 व चिखली तालुक्यातील 112 गावांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये महाराष्ट्र भुजल अधिनियम 2009 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल.

भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांनी कळविले आहे