सदेह वैकुंठ गमन : एक बनाव !

39

[जगद्गुरू संंत तुकाराम महाराज स्मृती दिन]

जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील देहू येथे वसंत पंचमी – माघ शुद्ध पंचमी शके १५२८ दि.२२ जानेवारी १६०८ रोजी झाला. पंढरपूरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. त्यांना वारकरी संतमंडळी ‘जगद्‌गुरु’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. ते लोककवी होते – “जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले!! तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!!” अशा प्रकारचे अभंग त्यांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. ते वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संतशिरोमणी होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले –

“ऐसे कैसे जाले भोंदू ! कर्म करोनि म्हणती सिधू !! अंगा लावुनिया राख ! डोळे झांकुनि करती पाप !! तुका म्हणे सांगो किती ! जळो तयांची संगती !!”

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संतकवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. सर्वसामान्य जनतेला तोंडपाठ असलेले त्यांचे अभंग पदोपदी आजही आठवतात. त्यांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही जिभेवर रुळताना दिसतात. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या –

“नको नको मना गुंतू माया जाळी ! काळ आला जवळी ग्रासावया !! तुका म्हणे तुला सोडविना कोणी ! एका चक्रपाणि वांचुनिया !!”

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती तरंगत जनसामान्यांच्या मुखांमधून अखंड प्रवाहीत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने ते या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी, त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम त्यांनी केले. महाराजांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहेत. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकोबाराय हे आठव्या पिढीतील नायक होते. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे यांनी केलेले आहे.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई हे होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई – आवली हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले. संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा – शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. सद्गुरू चैतन्य बाबांनी त्यांना परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठलाचे दर्शन घडवून दिले. त्यांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत फेकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना त्यांना अभंगांची रचना सहजच स्फुरू लागली –

“बोले तैसा चाले, त्याची वंदीन पाऊले ! तुका म्हणे देव, तया चरणीं माझा भाव !!”

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांनी जगद्गुरू तुकोबांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी स्वामी नामक बुवाने त्यांना खूप त्रास दिला. परंतु त्यांच्या पत्नी आवलीने मंबाजीला बदडण्याचा प्रयत्न केल्यावर तो पळून गेला. पण नंतर त्यांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत मराठीभाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. कोणताच संताचे अशाप्रकारे देहावसान झालेले नाही. याच मनुवादी विचाराने बुरसटलेल्या समाज कंटकांनी महाराजांची हत्या करून त्यांच्या सदेह वैकुंठ गमनाचा बनाव केल्याचेही काही इतहासकारांनी म्हटले आहे. त्यांच्या जन्मवर्ष व स्मृती दिन यांबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. स्मृतीदिन फाल्गुन कृष्ण २ शके १५७० अर्थात इ.स.१६५० मध्ये कुठे दि.९ मार्च तर कुठे दि.१९ मार्च अशी मतमतांतरे आहेत. त्या दिवशी हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष परब्रह्म विठ्ठलाने त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. त्यांच्या वैकुंठ गमनाच्या याच फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखले जाते.
!! त्यांच्या परमपावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली,जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com