कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलं बाधित होण्याचा अंदाज ; जिल्हा प्रशासनाची तयारी;विविध विभागांनी समन्वय ठेवून काम करावे -पालकमंत्री बाळासाहेब पाटील

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड,माण मोबाईल.9075686100

सातारा(दि.11जून):- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्तींनी व्यक्त केला आहे. या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाबरोबरच जिल्हा प्रशासन तयारी करीत आहे. याच अनुषंगाने माझे मूल-माझी जबाबदारी हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमात ज्या ज्या विभागांना जबाबदारी दिली आहे त्यांनी योग्य पद्धतीने व समन्वयाने काम करुन तिसऱ्या लाटेत मुले बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या माझे मुल-माझी जबाबदारी या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ सभापती जयसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते.
कोरोनाचा मुलांसाठी संभाव्य धोका लक्षात घेऊन कुटुंब व सामाजिक स्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, उपलब्ध मनुष्यबळाला प्रशिक्षीत करुन वेळीच ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रीटमेंट करुन उपलब्ध करुन देणे तसेच मुले व पालकांचे वेळोवेळी समुपदेशन करुन त्यांना धीर देणे व कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात सथैर्य निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमाची माहिती होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यशाळा घ्याव्यात. प्रत्येक आठवड्याला या उपक्रमाचा आढावा घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण विभाग, 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण विभागाच्या शाळांमधील 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी समाज कल्याण विभाग व 0 ते 18 वयोगटातील निरीक्षण गृह व बालसुधार गृहातील मुलांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जाबदारी सोपविण्यात आली आहे. ज्या ज्या विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी प्रत्येक तालुक्यातील मुलांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्या पद्धतीने आराखडा तयार करुन तालुकास्तरावर बैठका घ्या. जे कोणी बैठकीला येणार नाहीत त्यांना समज द्या.

या उपक्रमात तज्ञ डॉक्टरांनीही काम करण्यास सहमती दाखवली असून डॉक्टरांचे मार्गदर्शनही या उपक्रमासाठी उपयुक्त ठरणार आहे. येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी एकत्रित येवून लढुया, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.आजकाल मुले ही मैदानी खेळाकडे दूर्लक्ष करीत असून मोबाईलमध्ये जास्त मग्न राहत आहे. त्यांना खेळाबरोबरच व्यायाम, योगाचे महत्व पटवून दिले पाहिजे. माझे मुल-माझी जबाबदारी या उपक्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुले कमी प्रमाणात बाधित झाले आहेत. परंतु संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुलांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य सुविधा वाढवियावर भर देण्यात येत असून माझे मूल-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत अंगणवाडी सेविका व शिक्षक यांना मुलांची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांना जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ट्रेसिंग, टेस्टींग व उपचार हा त्रिसुत्री कार्यक्रम राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या वेळी सांगितले.प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी माझे मूल-माजी जबाबदारी या उपक्रमाची माहिती दिली.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माझे मूल-माझी जाबाबदारी उपक्रमाच्या आदर्श कार्यप्रणाली, लोगो, पोस्टरचे, प्रकाशन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थान विभागने तयार कलेल्या चित्रफितीचे अनावरणही हस्ते मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.