संदीप वाळके सहा दिवसांंपासून बेपत्ता झाल्याने उलटसुलट चर्चांना ऊत

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23जून):;तालुक्यातील पोखर्णी (वाळके) गावचे रहिवासी, मागील काही वर्षात रेती व्यावसायिक म्हणून परभणी जिल्ह्यात कायम चर्चेत राहणारे संदीप बालासाहेब वाळके हे मागील सहा दिवसांंपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने तालुक्यासह जिल्हाभरात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. रेती व्यावसायिक संदीप वाळके हे बेपत्ता होण्यामागे मोठी आर्थिक देवाण-घेवाण किंवा व्यवहार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी त्यांच्या कुटुंबीयांनी ‘मिसिंग’ची तक्रार देऊन पाच दिवसानंतरही त्यांचा पत्ता लागत नसल्याने यामागे मोठे षड्यंत्र आहे की आर्थिक देवाणघेवाण किंवा मौठा व्यवहार आहे की काय या चर्चेने गंगाखेड तालुक्यात जिल्हाभरात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

        तालुक्यातील पोखर्णी (वाळके) येथील रहिवासी रेती व्यावसायिक संदीप वाळके हे दि.१७ जून पासून आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिजायर कारसह बेपत्ता असल्याची मिसिंग तक्रार संदीप वाळके यांचे चूलत भाऊ दिपक यशवंत वाळके यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. या घटनेस आजघडीला सहा दिवस पूर्ण होत आहेत. पोलीस यंत्रणा याबाबतीत युध्दपातळीवर तपास करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु जिल्हास्तरावरील शिवसेनेच्या राजकीय लोकप्रतिनिधी व नेत्यांंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, सन २०१७ ची तालुक्यातील धारासुर जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढल्यानंतर राजकीय चर्चेत आलेले व तालुक्यातील पोखर्णी (वाळके) गावचे माजी सरपंच असलेले संदीप वाळके यांचे बेपत्ता होणे हा इतर ‘मिसिंग’ तक्रारी सारखा साधा विषय नसल्याने पोलीस यंत्रणेसह नागरिकात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. . रेती व्यावसायिक संदीप वाळके यांचे रहस्यमय बेपत्ता होणे हा मात्र तालुक्यात सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय होऊ लागला आहे.