प्रवास एका लेखकाचा : आत्मचरित्रकार !

26

[मराठी सारस्वत- व्यंकटेश माडगूळकर जयंती विशेष]

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. त्यांना शिकारीचा फार छंद होता. त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते सन १९५०च्या सुमारास मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी माणदेशी माणसे हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तेव्हाच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन व कल्पना रम्यता यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या या कथासंग्रहापासून झाला. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यांत गावाकडील गोष्टी, काळी आई यांसारखे कथासंग्रह, ‘बनगरवाडी’ ही कादंबरी आणि सती ही नाट्यकृती यांचा अंतर्भाव आहे.

व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे दि.६ जुलै १९२७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दिगंबर बळवंत माडगूळकर व आईचे नाव बनुताई होते. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. ते मराठी कवी व गीतकार ग.दि.माडगूळकर यांचे धाकटे बंधू होत. व्यंकटेश माडगूळकर हे सन १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. कोवळे दिवस या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. ‘पुढचं पाऊल’ ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी होय. एका दलित कलावंताच्या जीवनावरील या कादंबरीत त्याच्यावरील अन्यायाबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.

व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली- तू वेडा कुंभार, सती, पती गेले गं काठेवाडी ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. कुनाचा कुनाला मेळ न्हाई आणि बिनबियांचे झाड ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली. ‘प्रवास एका लेखकाचा’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. सारस्वत व्यंकटेश माडगूळकर यांचे दि.२८ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.

!! जयंती निमित्त त्यांना पुरोगामी संदेश परिवारातर्फे शतकोटी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी[मराठी सारस्वत व दै.रयतेचा वाली- जिल्हा प्रतिनिधी.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.मधुभाष – ७७७५०४१०८६.