बंगाली साहित्य-संगीतात आमुलाग्र बदलकर्ते !

31

[गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्मृतिदिन विशेष]

रवींद्रनाथजी टागोर यांना गुरुदेव असेही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आदी होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीत यांत एक आमूलाग्र बदल घडून आला. ते भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते. त्यांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली व त्यानंतर १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती तथा रवीन्द्रसंगिताचे सृजन हे त्यांचे प्रमुख जीवनकार्य होते. त्यांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारली आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
गुरूदेवांचा जन्म एका पिराली ब्राह्मण कुटुंबात दि.७ मे १८६१ रोजी झाला. ते कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे जन्माला आले.

वडील देवेन्द्रनाथ टागोर व आई शारदादेवी यांच्या चौदा अपत्यांपैकी ते १३वे होत.त्यांनी ११व्या वर्षी मुंज झाल्यावर वडिलांसोबत भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. तेथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. त्यांनी इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययनही केले. इ.स.१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे ते प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापती प्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. प्रथम या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात त्यांनी रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्यासंगित, बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरेर स्वप्नभंग आदी रचना लिहिल्या. बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. परंतु कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. दि.९ नोव्हेंबर १८८३ रोजी त्यांनी मृणालिनीदेवी यांच्याशी विवाह केला.

या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये झाली. त्यापैकी दोघांचा बालमृत्यू झाला. गुरूदेवांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ त्यांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडांत पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासपूर्ण असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्रण यात रेखाटले आहे.सन १९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एक प्रार्थना गृह, प्रयोगशील शाळा, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. त्यांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचेही देहावसान घडले. वारसदार म्हणून नियमित मासिक उत्पन्न मिळू लागले.

याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही अर्थप्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य व खेया या रचना याच काळात प्रकाशित झाल्या. दि.१४ नोव्हे.१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी त्यांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. सन १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. इ.स.१९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. सन १९२१ साली ते व कृषी अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे श्रीनिकेतन असे नामकरण केले. या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. त्यानंतर त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला.

नाट्यकविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.जीवनाच्या शेवटच्या दशकात गुरूदेव पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्र्‍याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार या चित्रपटावरही पडलेला दिसतो. अखेरच्या काळात त्यांनी विज्ञानात विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे. त्यांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांची ठरली. सन १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात राहिले. दि.७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांनी कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे नश्वर देहाचा त्याग केला.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.द्वारा- प. पू. गुरुदेव हरदेव कृपया निवास,मु. एकताचौक, रामनगर, गडचिरोली.
मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com