सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण!

31

(मदनलाल धिंग्रा स्मृती जागृती विशेष)

फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलालजी धिंग्रा यांनी असे म्हटले, “आत्म बलिदान कसे करावे? ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे. ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे. याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो! इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे, अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे!”

मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.मदनलालजी धिंग्रा यांचा जन्म अमृतसर येथे दि.१८ सप्टेंबर १८८३ रोजी उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. त्यांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बीए झाले व इ.स.१९०६मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जुळला. ते उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. स्वा. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही. म्हणून ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलालजी आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते.

मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. ते आणि सावरकर यांची ही पहिली भेट! मदनलालजी तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ती सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायलीच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला व त्यात दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलालजी यांच्या वडिलांचा स्नेही होता.

या खुनाबद्दल त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. इंग्लंडच्या लंडन येथील पेन्टोनव्हिल तुरुंगात ते ‘भारत माता की जय’ असा उद्‌घोष करत फाशी गेले, देशासाठी त्यांनी प्राणार्पण केले. तो काळा दिवस म्हणजेच दि.१७ ऑगस्ट १९०९ हा होता.

!! त्यांच्या देशभक्तीला पुरोगामी संदेश परिवारातर्फे प्राणार्पण दिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दयोजना:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ९४२३७१४८८३.