गौरीपूजन

30

श्रावण,भाद्रपद यांच्याशी स्त्रियांचं खास जिव्हाळ्याचं नातं असते.त्यातलीत्यात माहेरवाशिणींच खासं.आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी,सौख्यासाठी,समृद्धीसाठी,भरभराटीसाठी विविध पूजा,व्रते,संकल्प करण्याची गृहलक्ष्मीची परंपरा आजही चालु आहे आणि हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात,तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीआगमनाचा.जेंव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेंव्हा ती गौरी म्हणून येते,अशी कहाणी सांगितली जाते.माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे.त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते,काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते.ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात.महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा – कनिष्ठा,सखी – पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात.

गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही आपल्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.गौरी एका दिवशी येतात,दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात.
त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते.गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते.या दिवशी सर्व माहेरवाशिण एकत्र येऊन गौरीची पूजा करतात.यामागची पौराणिक कथा अशी की,फार पूर्वी दानवांचे राज्य होते.दानव देवांना फार त्रास देत असत.सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली.म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र येवून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली.महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले.या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो.आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतू असतो.गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात.ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात.काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात.तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात.एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी,तळयाकाठी अथवा विहीरीपाशी जाते.चार खडे ताम्हणात घेते.तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात.गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे.खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून,हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात.पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात.उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात.गौरींचे दोन मुखवटे असतात.एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात.दोन सवाष्णी गौरी घरी आणतात.गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात.गौरी आणतेवेळी गौरी कशाच्या पाऊली आली,सोन्या – मोत्याच्या पाऊली आली असे म्हणत गौरी आणतात.एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे.उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात.दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती,जिवती,दुभत्याचे कपाट,कोठीची खोली,दागिन्यांची पेटी दाखवतात.नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात.खोबऱ्याची वाटी,फळे,कुंकवाचे करंडे ठेवतात.काही बायका गौरींपुढे लाडू,करंज्या,चकल्या इ.ताजे पदार्थ करून ठेवतात.गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात.हळद – कुंकू,गंध,फूल,अक्षता,दुर्वा,आघाडा,
वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात.तसेच काही ठिकाणी म्हणजे कोकणात गौरीला तिखटाचे जेवण दिले जाते.तसेच त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद – कुंकू,साखर देतात.दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात.गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात.साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात.दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात.तळण,खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.तिस-या दिवशी गव्हल्याची खीर,कानवला व दही – भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते,राहाते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं.घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी,आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार,व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने,श्रद्धेने व मनोभावे करते.अशा ह्या महालक्ष्मीला,वैभवलक्ष्मीला,वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्‍या,गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम व देशावरील कोरोना संकट दूर व्हावे हीच प्रार्थना.

✒️लेखक:-राजेंद्र लाड (शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)