दिव्यांगांना अंत्यदोय योजनेतुन स्वतंत्र शिधापत्रिका द्या; गुलाबराव वाघ

28

🔸बिलखेडा ग्रामपंचायतचे धरणगाव तहसीलला निवेदन

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगाव(दि.13सप्टेंबर):- दिव्यांग नागरिकांच्या संदर्भात शासनाच्या दि. १७ जुलै २०१९ च्या निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे ३५ किलो धान्य आणि अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका द्याव्यात. तसेच त्यांची दारिद्र्य रेषेखाली नाव नोंदणी करावी. असे निवेदन बिलखेडा ग्रामपंचायत व दिव्यांग बांधवांच्या वतीने शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणगावचे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना देण्यात आले.मा.नायब तहसिलदार सातपुते यांना निवेदन सादर प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, शासन निर्णयानुसार दिव्यांग, विधवा, ६० वर्षावरील व्यक्ती, आदिवासी, भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, तसेच कुष्ठरोगी, एचआयव्हीग्रस्त यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्याच्या सूचना शासन निर्णयात केलेल्या आहेत. परंतु, अजूनही काही दुर्लक्षित असलेल्या दिव्यांग बंधू – भगिनींना या शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. त्यांना ३५ किलो धान्य मिळत नाही.

काही दिव्यांगांच्या शिधापत्रिका क प्रवर्गात आहेत. या सर्वांचा गाव पातळीवर सर्व्हे करून पात्र दिव्यांगांना नवीन सुधारित शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका देऊन ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
आधीच गेल्या फेब्रुवारी २०२० पासून कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग, वृद्धांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ठोस असे उत्पन्न नाही. त्यामुळे दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काही दिव्यांगाची शिधापत्रिका असून देखील पैशाअभावी खरेदी करता आलेली नाही. इतकी हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्वांच्या शासनाने गांभीर्याने विचार करून त्यांना अंत्योदय  योजनेच्या शिधापत्रिका आणि ३५ किलो धान्य द्यावे. तसेच त्यांची नावे दारिद्र्य रेषेखाली यादीत नोंद करून घ्यावेत.

अन्यथा दिव्यांगाना नाईलाजाने त्यांच्या हक्काचे धान्य व शिधापत्रिका मिळण्यासाठी मोर्च्या व आंदोलन करायला भाग पाडू नये. असेही मा.गुलाबराव वाघ यांनी बिलखेडा ग्रामपंचायतचे ग्रामस्थ, दिव्यांग बांधव आणि शिवसेना पक्षाच्या वतीने निवेदन सादर प्रसंगी सांगितले.यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ.जनाआक्का ताई बोरगाव, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते नंदलाल महाजन, लोकमतचे प्रतिनिधी लक्ष्मण माळी तसेच, बिलखेडा येथील गोपाळ नवल भदाणे, सचिन भदाणे, रावसाहेब भदाणे, शिवाजी भदाणे, शालिक काटे, ओंकार भदाणे, राजेंद्र काटे, नंदू भदाणे, मोहन भदाणे, देविदास बडगुजर, सोमनाथ ठाकरे, वैभव भदाणे, गौरव भदाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.