गणपतराव देशमुख यांच्या पद्म पुरस्कारासाठी सकारात्मक कार्यवाही

41

🔸सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांचा पाठपुरावा- १० ऑगस्ट रोजी दिले होते निवेदने

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि 25सप्टेंबर):-महाराष्ट्राचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांना समाजसेवेसाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या जयंतीनिमित्त १० ऑगस्ट रोजी केली होती. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाच्या पातळीवरून सकारात्मक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी दिली.

महाराष्ट्रातून सर्वाधिक ११ वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. एक पक्ष, एक मतदारसंघ, एक झेंडा यासाठी त्यांचे नाव घेतले जाते. प्रामाणिकपणा, कष्टाच्या जोरावर त्यांनी ५१ वर्षे सांगोल्याचे नेतृत्व विधासभेत केले. त्यांनी राजकीय पदांपेक्षा लोकसेवेला अधिक महत्व दिले. त्यामुळे सांगोलासारख्या दुष्काळी भागात परिवर्तन घडून आले. त्यांच्या पाणी चळवळीमुळे शासनाला धोरणात्मक निर्णय घेणे भाग पडले. आमदार, विरोधी पक्षनेते, तसेच राज्याचे दोनवेळा कॅबिनेटमंत्रीपद त्यांनी सांभाळले. छोट्या कृतीतून त्यांनी नेहमी मोठे संदेश दिले. विधीमंडळ असो की रस्त्यावरची आंदोलने, त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला.

यासंदर्भाने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी म्हणून ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, आदींना निवेदने दिली होती. त्याला अनुसरून राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ढोणे यांच्याशी संपर्क साधून शिफारशीसाठी अधिक माहिती घेतली. त्यानंतर केंद्र शासनाच्या सुचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही केली आहे. पुढील काळात केंद्र शासनही सकारात्मक कार्यवाही करेल, अशी अपेक्षा ढोणे यांनी व्यक्त केली आहे.