अंगणवाडी ताई सुदृढ झाली तर संपूर्ण गाव सुदृढ होईल-खासदार प्रतापराव जाधव

40

🔹राष्ट्रीय पोषण अभियान -क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबादचा उपक्रम

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.28 सप्टेंबर):-शासनाच्या पोषण आहाराविषयी अधिकार व आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पोषण आहार व्यवस्थित मिळाला तर बालके सुदृढ होण्यास मदत होईल. अंगणवाडी ताई सुदृढ झाली, तर संपूर्ण गाव सुदृढ होईल असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमात केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद जिल्हा प्रशासन, बुलडाणा आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री मंगल कार्यालय, लोणार येथे आज 28 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले.

खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन दिपप्रज्वलन करून आणि रानभाजी व पोषण आहाराच्या प्रदर्शनाचे उदघाटन फित कापून केले. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती ज्योतीताई पडघान, लोणारच्या माजी नगराध्यक्षा रंजनाताई मापारी, पंचायत समिती उपसभापती मदनराव सुटे, जिल्हा परिषद सदस्य गोदावरीताई कोकाटे, नंदुभाऊ मापारी, पांडुरंग सरकटे, क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे, तहसिलदार श्री. नदाफ, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, टिटवीचे सरपंच भगवान कोकाटे, तालुका आरोग्य अधिकारी डी. एस. बलशेटवार, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, पत्रकार शेख समद शेख अहमद, नंदकुमार डव्हळे, उमेश कुटे, विट्ठल घायाळ, संतोष पुंड आदी उपस्थित होते.

यावेळी महिला व बाल विकास सभापती ज्योती पडघान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अरविंद रामरामे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन नंदिनी चव्हाण यांनी केले. यावेळी आयोजित पोषण आहार, रानभाजी बनविणे, रांगोळी, सुदृढ़ बालक आदि विविध स्पर्धांच्या विजेत्यांना क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो तर्फे “Poshan Abhiyaan-सही पोषण देश रोशन” छापलेले पारितोषिक वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर डी आर इंगळे आणि संच यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेवटी पोषण आहार शपथ घेण्यात आली. यावेळी सही पोषण-देश रोषण नारे देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विततेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, औरंगाबाद चे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व संपूर्ण ICDS विभागाने प्रयत्न केले.