कमळवेल्लीच्या सर्पमित्रांकडून ब-याच सापांना जीवदान

30

✒️विशेष झरीजामणी(सुनील शिरपुरे)

झरीजमनी(दि.8ऑक्टोबर):-पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात अनेक जीवजंतूंचा वावर असतो. यामुळे मानवाला खूप काळजीने वागावं लागते. थोडीशी जरी हयगय झाली तर या जीवजंतूंपासून ईजा होण्याची दाट शक्यता असते. परिणामी काही जीवजंतूंमुळे जीवही गमवावा लागतो. यातीलच एक जीव म्हणजे साप. खेड्यापाड्यात सापांचा वावर जास्तच असतो. काही साप विषारी असते, तर काही बिनविषारी. विषारी सापाने दंश केलेल्या व्यक्तीला तात्काळ उपचार न मिळाल्यास त्याचा जीवही जात असतो.

याच भितीमुळे खेड्यापाड्यात कोणताही साप निघाला तरी त्याला सरळसरळ मारूनच टाकल्या जाते. यामुळे अनेक सापांचा पण जीव जातो. मानवाच्या या कृतीमुळे अनेक सापाच्या प्रजाती नष्ट व्हायला लागले. कारण प्रत्येक गावात सर्पमित्र असतोच असं नाही. शिवाय या सर्पमित्रांना बोलवायची वेळ आल्यास त्यांना बाहेरगावहून बोलवावं लागत असे.

आता ब-याच खेड्यापाड्यातील युवक सर्पमित्राचे प्रशिक्षण घ्यायला लागले. त्यामुळे कुठे तरी या सापांच्या प्रजाती नष्ट होण्याला आळा बसेल असं म्हणायला हरकत नाही. याच सर्पमित्रातील मित्रांपैकी कमळवेल्ली येथील धिरज महेंद्र अग्रवाल व शेख सलमान शेख उस्मान या दोन सर्पमित्रांनी अनेक सापांना जीवदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.