✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.5नोव्हेंबर):-आठवडाभरापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यानी संप पुकारला होता.वेतनाचा प्रश्न मार्गी लागताच संप मागे घेतल्याचे संघटनेने जाहीर केले होते. मात्र गुरुवारी बीड जिल्ह्यातील एसटी बसेसचा संप चालूच होता.संपामुळे जिल्ह्यातील एकाही आगारातून बसेस सुटल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागले. याचवेळी आष्टी तालुक्यातील कडा येथील बसस्थानकात एका बस चालकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
गुरुवारी दुपारी जामखेड-पुणे बसवरील चालक बाळू महादेव कदम (३५, रा.आष्टी ) याने विष प्राशन केले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी येथील बाळू कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वीही ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते.
नेमक काय घडल?
जामखेड-पुणे बस घेऊन बाळू कदम निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक कदम यांनी बसस्थानक परिसरात विष प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांनी विष प्राशन का केले याचे कारण मात्र अद्यापि अस्पष्ट आहे.