महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – पुजा मोरे

48

🔹आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट ; गुन्हा दाखल न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.30नोव्हेंबर):-आठ दिवसापासून गावांचा वीज पुरवठा खंडित असल्याने पीक सुकून जात आहे. या नैराश्याने गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील एका तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत रविवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी या शेतकऱ्याने आत्महत्या केली नसून महावितरणने त्याचा खून केला आहे असा आरोप केला असून कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी पुजा मोरे यांनी दिला आहे.

अगोदरच अतिवृष्टीने कंबर मोडलेला शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली केली जात आहे. आता हिच वसुली शेतकर्‍याच्या जिवावर उठली असून 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील कृष्णा गायके याने शेतात कांदा गोट लागवडीसाठी कांद्याचे बियाणे आणले होते. मात्र आठ दिवसापासून महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने शेतातील विहिरीत पाणी असताना देखील इतर पिकांना पाणी देता येत नाही, आणि कांदा ही लागवड करता येत नाही. अगोदरच अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले, याचे अनुदान आजून खात्यावर जमा झालेले नाही. मात्र 7 ते 8 हजार रूपये वीज बिल कुठून भरायचं ?, आठ दिवसात कांदा लागवड केला नाही तर तो पूर्णपणे सडून जातो. त्यामुळे बियाण्यात गुंतवलेले पैसे सुद्धा वाया जाणार, या विवंचनेतुन त्याने रविवारी स्वतःच्या शेतातच आत्महत्या केली.

दरम्यान सोमवारी पूजा मोरे यांनी या कुटूंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, 23 वर्षीय शेतकरी मुलांनी आत्महत्या करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. मागील दोन वर्षापासून पिक विमा नाही, खरिपाचे उत्पन्न नाही, अतिवृष्टीची मदत नाही. आमचेच शासनाकडे देणे बाकी असताना सरकार ऐन रब्बीच्या तोंडावर सक्तीने वीज बिल वसुली करत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेत त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. 12 दिवसापासून निपाणी जवळका सह परिसरातील गावे अंधारात आहे. दिवाळीमध्ये देखील गावात वीज नव्हती, असे असताना शेतकऱ्याची उद्विग्न अवस्था होणं साहजिक आहे. तरी कृष्णा गायके याने केलेल्या आत्महत्येस महावितरणच जबाबदार असून या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ वीज वसुली थांबवावी, कट केलेले कनेक्शन जोडा नसता कोणत्याही क्षणी महावितरण समोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी महावितरणला दिला आहे.