अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले………

193

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

पोलिस ठाण्यातील माहितीनुसार, १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या मिसिंगचे प्रमाण वाढले आहे. मुलींचे आई-वडील मुलगी पळून गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदवीत आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे सोपे असते. कारण त्यांना भविष्याबाबत योग्य ती जाण नसते. प्रियकर आपल्यावर जीव ओवाळून टाकतोय म्हणजे तो “हिरो’ आहे, असा मुलींचा समज असतो. वयात येत असताना लग्नाबाबत आकर्षणही असते. दोघेही पळून नातेवाईकाकडे जातात किंवा कुठेतरी कामाच्या शोधात निघून जातात. मात्र, महिन्या-दोन महिन्यातच त्यांच्या मुलीला संसाराचे चटके बसू लागतात. परंतु, घरी परतण्याची इच्छा असूनही त्यांना घराची वाट धरता येत नाही.

शारीरिक आकर्षण मुली वयात येत असताना शारीरिक बदलांसह शारीरिक आकर्षण प्रामुख्याने प्रेमात पडणाऱ्यांसाठी जबाबदार असते. टीव्ही, चित्रपट आणि सोशल मीडियामुळे “प्रेम करणे म्हणजे तरूणाईचा हक्‍क’ अशी समजूत झाली आहे. चित्रपटातील “अंतरंग दृष्य’ आणि जाहिरातील मॉडेल्सचे बोल्डनेस याचाही परिणाम बालमनावर पडतो आहे. त्यामुळे प्रेमात पडल्यानंतर पळून जाण्यासाठी मुलांपेक्षा मुली जास्त उत्सूक असतात.

स्मार्ट फोनचा गरजेपेक्षा अधिक वापर, पालकांचे दुर्लक्ष आणि संस्काराअभावी १४ ते १७ वयोगटातील मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे.

विदर्भ मराठवाडा जळगाव , नाशिक, नगर, नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या उत्तर महाराष्ट्रात केवळ एका मार्च महिन्यात १८ ते ३० वयोगटातील तब्बल २९७ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. मोठी गंभीर बाब आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात तरुण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे एक तातडीची गंभीर सामाजिक समस्या म्हणून या विषयाकडे राज्य शासनाने व सामाजिक कार्यकर्त्यांनी बघणे आवश्यक झाले आहे. राज्यभरासाठी ही चिंताजनक स्थिती आहे. एकट्या मार्च महिन्यात राज्यभरात अशा एकूण २ हजार ३७५ तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. या एका महिन्यात सर्वात जास्त ६३३ मुली पश्चिम महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्या. त्या खालोखाल ६२४ हा कोकणाचा आकडा आहे. विदर्भात ५९० चा आकडा आहे. तर मराठवाड्यात २०१ तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या संकेत स्थळावर मिसिंग या कॉलम मध्ये ही नोंद झाली आहे. अर्थात या पैकी काही तरुणी स्वतःहून घरी परतल्या असतील. काही तरुणींना पोलिसांनी शोधून आणले असेल. काहींनी परस्पर विवाह देखील केला असण्याची शक्यता आहे. तर काहींचा अजून काहीच थांगपत्ता लागलेला नसेल.ज्यांचा अद्याप काहीच थांगपत्ता लागलेला नाही अशा प्रकरणांमध्ये त्या तरुणींचा शोध घेण्याच्या कामाचे पोलिस दलासमोर मोठे आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात बेपत्ता झालेल्या २९७ मुलींपैकी एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ११५ तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर नाशिक जिल्ह्यातही १६४ ची नोंद आहे.

दहावी,बारावीला शिकणारी,आश्रम शाळांमध्ये राहणारी, पालकांपासून दूर असलेली मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यात १४ ते १७ वयोगटातील मुला-मुलींची संख्या अधिक असून पालकांच्या योग्य संस्कार होत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे. मुले-मुली अल्पवयीन असल्याने शासनाच्या आदेशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. आयुष्यात प्रत्येकाला प्रेम करण्याची संधी मिळते. मानसिक आणि शारीरिक तयारी नसतानाही तरुण-तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात. प्रेमप्रकरणातून ते पळूनही जातात. पळून गेल्यानंतर होणारा त्रास ते कोणालाही सांगू शकत नाहीत, यातून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही घडत आहे.काही आत्महत्या करत आहे.

सोशील मीडियामुळे मुला मुलींमध्ये संपर्क जास्त वाढतआहे.व्हाट्सएप,फेसबुक, इन्स्टाग्राम यांचा मूल मुली सर्रास वापर करत आहे .याचा फायदा घेऊन काही तरुण अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहे.

पूर्वीच्या काळात अल्पवयीनांना लैंगिक व्यवहाराची माहिती उशिरा कळत होती. मात्र, आताच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून लवकरच लैंगिक व्यवहाराबाबत अल्पवयीन मुले-मुली ज्ञात होत आहेत. त्यामुळे आताच्या पिढीतील मुलांं-मुलींचे हार्मोन्सचा विकास लवकरच होत आहे. परिणामी अल्पवयीनांमध्ये म्यॅचुरिटी येत असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञांचे मत आहे.पाल्यांना भविष्याची जाणीव करुन देणे योग्यपालकांनी आपल्या मुलांना भविष्यातील जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. मुलांना भविष्यात काय करायचे आहे. पुढे त्यांना कशा प्रकारे कुटुंबीयांंची जबाबदारी सांभाळायची आहे. आपण कुठे चुकत आहेत आदींची मुला-मुलींना जाणीव करून देणे आजच्या काळाची गरज आहे. आताच्या चुकीमुळे आपल्याला पुढील जीवनात पश्चातापाची वेळ येऊ नये याकरिता पालकांनी पाल्याना वारंवार जबाबदारीची आठवण करून देणे गरजेच्े असल्याचे मत मनोरुग्ण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.पालकांनी आपल्या मुलां मुलींच्या हालचालींवर लक्ष ठेवायला पाहिजे..मित्र मैत्रिणी कोण आहेत,त्यांचा शाळेतील वावर,याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.त्याचबरोबर आपल्या पाल्यांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून संवाद साधण्याची गरज आहे.याशिवाय या वयातील मुला मुलींचे समुपदेशन देखील करणे आवश्यक आहे.