खर्डीतील ग्रामसभा तणावपूर्ण

35

✒️अमोल कुलकर्णी(विशेष प्रतिनिधी)

खर्डी(दि.25मे):- सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी गावातील ग्रामसभा 18 मे रोजी कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती.नंतर दिनांक 25 मे रोजी ग्रामसभा घेण्यात आली.सदर सभा विविध चर्चेतून पार पडली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवताना एकही कार्य पूर्ण झाल्याचे दिसून आले नाही. गावातील प्रवासी निवाराशेड असेल सार्वजनिक मुतारी असतील व अन्य अनुषंगिक विषयांना कोणत्याही प्रकारची पूर्तता झाली नसल्याचे दिसून आले. गावातील अनेक विषयांची विकासकामे होत असताना तेथे कामावर खर्च झालेला विहित नमुन्यातील फलक लावावा, काम सुरू केल्याचे दिनांक आणि काम पूर्तता झाल्याची दिनांक यावर उल्लेख असावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

गावातील लिंगायत स्मशानभूमी बाबत विचारणा केली असता गट नंबर 550 मधील शासन अधिग्रहित तीन गुंठा जागेचे मोजणी करून भिंत कंपाउंड लवकरच करून देण्याचे ग्रामसभा अध्यक्ष सरपंच यांनी जाहीर केले.मागील कालखंडातील ग्रामसेवक यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यावर उचित कारवाई अहवाल सादर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. या ग्रामसभेत महिला प्रवर्ग सदस्य असून देखील त्या अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले किरकोळ दारू विक्रीचा परवाना मागणीबाबत पुढील ग्रामसभेत कारवाई करण्याचे सांगण्यात आले दीड वर्षे कालखंडामध्ये झालेल्या कामांचा आढावा मागितल्यानंतर कोणत्याही प्रकारचे उत्तर सरपंच तसेच ग्रामसेवक यांना देता आले नाही.गावातील घरकुल मंजुरी मध्ये 323 पैकी 17 अपात्र ठरवण्यात आले तर उर्वरित मंजूर पैकी केवळ 19 जणांची नावे पंचायत समितीकडून मंजूर करण्यात आल्याची यादी वाचून दाखवण्यात आली यामध्ये यातील 5 खुल्या गटातील तर 14 अनुसूचित जाती जमाती गटातील असे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.परंतु या मध्ये देखील खरे गरजू घरकुल धारक उपेक्षित राहिल्याचे दिसून आले.

गावातील मासिक सभेमधील विषय ग्रामसभेत घेऊ नका असे सांगितल्यामुळे काही सदस्य आक्रमक झाले.यावेळी ग्रामस्थांनी अनेक विकासाचे प्रश्न विचारले पण कोणतेच उत्तरे न मिळाल्याने गावातील अनेक ग्रामस्थ वैतागून ग्रामसभेतून बाहेर पडू लागले नंतर उपसरपंच शरद रोंगे यांनी एक व्यक्ती एक प्रश्न असे सूचित केले.बऱ्याच गदारोळात शेवटी अपुरे विषय आणि उत्तरे ठेवून ग्रामसभा गुंडाळण्यात आली.त्यामुळं या ग्रामपंचायत कारभार आणि विकास यावर गावात साधक बाधक चर्चा सुरू झाली.या अनेक विषयात सत्ताधारी परिचारक यांनी स्वतः लक्ष घालण्याचे गरजेचे वाटू लागले असल्याची चर्चा ग्रामस्थामधून सुरू झाली.यावेळी सरपंच मनीषा सव्वाशे,उपसरपंच शरद रोंगे,नारायण रोंगे ग्रामविकास अधिकारी बी.व्ही. कुलकर्णी आदी सह आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्राथमिक शिक्षण विभागाचे सदस्य उपस्थित होते.