हभप भगवानदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी वारी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

32

🔹रामदेवजी नगरात उत्साही वातावरणात स्वागत!….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.12जून):-तालुक्यातील गेल्या ३० वर्षांची परंपरा असलेली माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर हभप भगवानदास महाराज धरणगाव यांच्या नेतृत्वखाली आज रोजी श्रीक्षेत्र धरणगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी वारी निघाली. माऊली संस्थेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींचे पादुकापूजन करून प्रस्थान करण्यात आले. मोठा माळीवाडा रामलीला चौक या ठिकाणी शिवसेना संपर्क संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माउलींची आरती करण्यात आली. गुजराती गल्ली परिसरात श्रीजी जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी यांच्यावतीने जाणाऱ्या भाविक भक्तांना साबुदाणा फराळ देण्यात आला. लोहार गल्ली, गुजराती गल्ली, तेलाटी गल्ली परिसर या ठिकाणी भाविक भक्तांसाठी त्या त्या ठिकाणातील भाविकांनी सरबतची व्यवस्था केली होती.

यावेळी सर्व वारी मार्गात सडा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. हि वारी दिंडी रामदेवजी नगरात आली असता सडा, रांगोळ्या व फुलांच्या वर्षावात विठ्ठल नामघोष व टाळ मृदंगच्या निनादात अध्यात्मिक व उत्साही वातावरणात हभप भगवानदास महाराज यांचे माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे व सहकाऱ्यांनी मंगलमय वातावरणात स्वागत केले. तद्नंतर रामदेवजी मंदिर परिसरात शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, उपनगराध्यक्ष करण वाघरे, हभप आर. डी. महाजन यांच्या हस्ते दिंडीत पायी वारी करणाऱ्या भाविकांना फराळ व सरबत देवून सदिच्छा भेट घेवुन स्वागत केले. तद्नंतर वारीचे प्रस्थान बांभोरी गावाच्या दिशेने झाले. आज दुपारी बांभोरी येथे भोजन आटोपून एरंडोल येथे रात्रीला दिंडीचा मुक्काम आहे. पायी वारी दर मुक्कामाला रात्री हरिपाठ , किर्तन करीत व दिवसा टाळ मृदंग व हरि नाम घोषात मार्गक्रमण करणार आहे.

दिंडी चा मुक्काम आषाढी एकादशीपर्यंत या दिंडीचा मुक्काम असेल या मठात आषाढी वारीनिमित्त दररोज हरिपाठ, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन असते. शेकडो वारकऱ्यांचा मेळा येथे जमून विठू राया च्या दर्शना सोबतच विठ्ठल नामाचा रंगणार आहे. गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारी मुळे ही पायी वारी प्रातिनिधिक स्वरूपात पार पडली होती मात्र यंदा मोकळ्या वातावरणात वारकरी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे तर पायी दिंडी साठी जागोजागी अन्न दात्याकडून अन्नदान होत असतो. व सर्व सोयी सुविधा पण दानशूर मंडळी करीत असते. या पायी दिंडी ला परिसरातील भाविक, वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातले भक्तगण यांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभत असते.