संजीव भट्टला आणखी किती वर्ष सडवणार?

35

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.20सप्टेंबर):-मुंबईच्या मातीत शिक्षण घेतलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना ५ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली. गुजरात सरकारने केलेली ही अटक अन्यायकारक आहे, मात्र आज तब्बल ४ वर्षानंतरही सरकार त्यांना आणखी काही वर्षे तुरुंगातच सडवू पाहत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या संजीव भट्ट हे खऱ्या अर्थाने चर्चेत आले ते त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे. तेही आयोगासमोर. त्यांनी या प्रतिज्ञापत्रातून थेट तोफ डागली ते सध्याचे पंतप्रधान व तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्यावर.

२००२ साली गुजरातमध्ये दंगल झाली. या दंगलीत नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत स्पष्ट आदेश दिले की, “उद्या हिंदू राग व्यक्त करतील, तेव्हा हिंदूंना राग व्यक्त करू द्या!”

मोदी यांनी दिलेला हा आदेश ज्या बैठकीत दिला, त्यावेळी मी (भट्ट ) उपस्थित होतो, असे प्रतिज्ञापत्र संजीव भट्ट यांनी या दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगापुढे दिले.

भट्ट यांच्या या प्रतिज्ञापत्रातील या स्टेटमेंटमुळे मोदी यांच्या प्रतिमेवर हा दंगलीचा कायम डाग लागला आहे. मात्र या प्रतिज्ञापत्रातील स्टेटमेंटनंतर भट्ट यांचा सरकारने अतोनात छळ केला. इतकेच नव्हे तर त्यांना एका वकिलाला फसवल्याच्या २७ वर्षे जुन्या खटल्यात गोवण्यात आले. आजही ते कैदेत आहेत, आणि या दंगलीतील प्रमुख आरोपी नरेंद्र मोदी यांना न्यायालयाने या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. दुर्दैवाने प्रसारमाध्यमांत या बातमीची वाच्यताही करण्यात येत नाही व सर्व राजकीय पक्षांतील नेते या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत.