अज्ञानाला सज्ञान बनविणारे संत गाडगेबाबा

102

उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही. ते साफसफाई करण्यासाठी त्यांना असंघटीत मागासवर्गीय समाजाचे कामगार लागतात. पण जेव्हा त्यांना न्याय,हक्क आणि अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा हीच मंडळी त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. असा उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा आज ही प्रेरणादायी असायला पाहिजेत. कोविड २०१९,२०२० च्या महामारीत ज्यांनी जीवाची बाजीलावून स्वच्छता ठेवली. त्यांच्या जीवतोड कामगिरीवर विशेष स्वच्छतेचे पुरस्कार मिळविले. त्यासाठी विशेष निधी मिळविला. त्या नंतर २०२१,२०२२ ला याचं कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. ए सी कार्यालयात बसणाऱ्या अधिकारी वर्गांना या स्वच्छतेचे व ते ठेवणाऱ्या कामगारांचे महत्व कधी कळणार? समाज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नसते. समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही. ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविण्यासाठीच असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आणि त्यासाठी त्यांना किती खोटे बोलण्याचे कैशल्य आत्मसात करावे लागते. ते गरिबांना समजू शकत नाही. मग हेच उच्चशिक्षित गाडगेबाबाना कसे समजून घेतील.

भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी. आर्थिक शोषण होते म्हणूनच जास्त आत्महत्या करतात. कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते. म्हणुन त्याला ऐनवेळी कृषि उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात. त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात. का होते असे? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते. गाडगेबाबाचे शिक्षण आणि त्यांची समाज प्रबोधन करण्याची पद्धत म्हणजे किर्तन पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात. पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगून पटणार नाही.

सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षा तुन दोन वेळा येतात. एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते. गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे. ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो. आज प्रत्येकजन आपला कुटुंबा पुरता विचार करतो. घर, परिसर, गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता. आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही. पण गाड्गेबाबानी दहाकलमी कार्यक्रम राबविला तो किती लोकांना माहित आहे?
काय म्हणतात संत गाडगेबाबा…

१) भूकेलेल्यांना – अन्न,२) तहानलेल्याना – पाणी, ३) उघड्या नागड्या ना – वस्त्र, कपडा, ४) गरीब मुलामुलींना – शिक्षणासाठी मदत, ५) बेघरांना – आसरा, ६) बिमार लोकांना – औषधोपचार, ७) बेकारांना – रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना – अभय, ९) गरीब मुलीमुलाचे – लग्न, १०) गोरगरीबना – शिक्षण, हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला. हेच कोणताही माणूस कुठे ही कधी ही जात,धर्म,प्रांत न पाहता राबवू शकतो.

गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरच्या महापरीनिर्वाणाने त्यांना खूप दुख झाले होते त्यांनी अन्नत्याग केला होता असे म्हणतात. संत गाडगेबाबा विज्ञानवादी होते. म्हणूनच ते खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो “ईश्वर देव कशात आहे?.” देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. “तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी ” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. ते ओबीसी समाजातील होते. पण त्यांना त्यांच्या समाजाने किंवा ओबीसीनी कधीच स्वीकारले नाही. त्यांचे तत्वज्ञान जाती धर्मासाठी कधीच नव्हते. ते खरे प्रबोधन करणारे संत होते. त्यांचा वैचारिक वारसा ओबीसी समाजाने ठेवला असता तर देशातील मंदिरे वसान पडली असती.आणि तीन टक्के समाज घरोघरी भिक्षा मागत फिरला असता. त्यांची हक्काची रोजगार हमी कायमची बंद पडली असती.हा ऐतिहासिक वैचारिक वारसा ओबीसी समाज कधी स्वीकारणार?

माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती. तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले,अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही.कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे,मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न केले.हा आदर्श आज कोणताही समाज घ्याला तयार नाही.ज्यांनी घेतला त्यांचा आज सर्वच ठिकाणी दबदबा (वैचारिक) आहे.

गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही.१४ फेबुवारी १९४९ ला गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती.महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०/११/१९४७ ते ३१/०३/१९४९ कायदेमंत्री होते ) आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले डॉ.तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक एक मिनिट महत्त्वाचे आहेत. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला.कोणते ही कार्यक्रम असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही.हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे.

त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो.उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही.९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो नसतो.लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रमात त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो.फोटोचा प्रश्नच नाही.म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हि खूप दुर्दव्य म्हणावे लागेल.काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.पण हिंदुत्वाची चौकट मान्य करूनच.गाडगेबाबा सारख समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून संघटना संस्था चालवितात. त्यामुळेच त्यांना आताच्या केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालया मार्फत लगाम लावला.
गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. ओबीसीना निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकारांचे आरक्षण नसेल.तर त्यांनी मतदान का करावे?. असे प्रश्न विचारण्याची त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत.

चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन समाजाच्या चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील.ओबीसीनी त्यांचा वैचारिक वारसा स्वीकारावा आणि त्यांना २० डिसेंबर स्मृतिदिनी खरी मानवंदना द्यावी.आम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते. संत महापुरुषांच्या जयंती दिनी, स्मृतिदिनी मी ते दरवर्षी करीत असतो त्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रतिमेला त्रिवार अभिवादन असते.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९