…..तर नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल!

34

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याकडे युवा वर्गाचा कल असतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पब किंवा क्लब, रेस्टॉरंट मध्ये जाऊन पार्टी करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, सायलंसरच्या पुंगळ्या काढून आवाज करणे, मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे, डी जे च्या किंवा लाऊडस्पीकरच्या तालावर चित्र विचित्र अंगविक्षेप करत नाचणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. यावर्षी तर हे प्रमाण खूपच वाढणार आहे कारण यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. मागील दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्याने या गोष्टी तरुणांना निर्धास्तपणे करता आल्या नाही असे असले तरीही काही महाभागांनी लपून छपून या गोष्टी केल्याच. यावर्षी तर कोणतेही निर्बंध नसल्याने आणि शासनानानेच पब, क्लब, रेस्टॉरंट रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तरुणांनी आतापासूनच पार्टीची तयारी सुरू केली आहे.

नववर्षाचे स्वागत अशाप्रकारे करणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा भंग करणे. दारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची फॅशनच झाली आहे. दारू पिऊन गाडी चालवताना बऱ्याचदा अपघात होतो आणि त्यात काही जण मरण पावतात तर काही जण जखमी होतात, काही तर कायमचे जायबंदी होतात. दारू पिऊन गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबे रस्त्यावर येतात. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःसह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे म्हणूनच नववर्षाचे स्वागत करताना स्वतःसोबत इतरांना त्रास होणार नाही याचे भान सर्वांनी ठेवावे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना बांधनाची ऐसीतैशी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. नववर्षाचे स्वागत म्हणजे चांगल्या – वाईट गोष्टी बाजूला सारून नववर्षाच्या सुर्योदयाच्या साक्षीने नवसंकल्पांचा अवलंब करणे, त्याचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागणे.

यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करताना पाश्चत्यांचे अंधानुकरण बंद करून प्रत्येकाने चांगले काम करण्याचा संकल्प केला पाहिजे. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा आत्महत्या करत आहेत. देशाचे रक्षणकर्ते जवान दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होत आहेत. मागील दोन ते तीन वर्ष जगावर कोरोनारुपी महामारीचे संकट होते. कोरोनाने होत्याचे नव्हते केले. कोरोनाने अनेकांचा रोजगार हिरावून नेला. काहींच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. काहींच्या घरातील घरातील कर्ता पुरुष कोरोनाने हिरावून नेला. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध नसल्याने हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहिली. दारूच्या नशेत नववर्षाचे स्वागत करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच शहीद जवानांच्या मुलांना मदत करून आपण नववर्ष साजरे करू शकतो.

कोरोनाने रोजगार हिरावून नेलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत करून, दिव्यांग, अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून, गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करून, वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करून आपण नववर्ष साजरे करू शकतो. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. नवीन वर्षाची सुरवात जर आपण रक्तदान करून केली तर एखाद्या रुग्णाचा प्राण वाचवल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते. नवीन वर्षात अवयव दानाचा संकल्पही आपण करू शकतो. गोरगरीब आणि गरजवंतांना त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना हवी ती मदत केल्यास, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आपण निर्माण करू शकतो. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरू शकतात त्यामुळे आपले आणि आपल्या प्रिय जणांचे जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जुने जाऊ द्या मरणालागुनी…. जाळुनी किंवा पुरुनी टाका……. या कवितेच्या ओळी प्रमाणे मागील वर्षीच्या सर्व चांगल्या वाईट भावना पुसून नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधिलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा संकल्प केला तर, नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५